गाणं असं की मोहम्मद रफीही थिरकलेले, धर्मेंद्र यांचा चित्रपट सुपरहिट अन् निर्मातेही मालामाल – Marathi News | Mohammed rafi dance on dharmendra superhit song during recording movie became blockbuster after release


धर्मेंद्र आणि मोहम्मद रफीImage Credit source: Instagram

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज गायक मोहम्मद रफी यांची गाणी आजही अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या प्रत्येक गाण्यात अशी जादू असायची की त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न निर्माते-दिग्दर्शक पाहू लागले होते. त्यांच्या आवाजातील कोणतंही गाणं हिट व्हायचं. अशाच एका गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान मोहम्मद रफी यांना इतका आनंद झाला, ते स्वत:ला त्यावर थिरकण्यापासून रोखू शकले नव्हते. पुढे जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा ते गाणं चित्रपटासह सुपरहिट झालं होतं.

जवळपास 51 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘प्रतिज्ञा’ या चित्रपटातील हे गाणं होतं. या चित्रपटातील गाण्यांना लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने संगीत दिलं होतं. तर आनंद बक्षी हे गीतकार होते. ‘प्रतिज्ञा’मधील गाणी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या सुमधूर आवाजात रेकॉर्ड करण्यात आली होती. या चित्रपटात एकूण चार गाणी होती. पण त्यातल्या एक गाण्याने इतिहास रचला आहे. हे गाणं आहे ‘मैं जट यमला पगला दिवाना’. या गाण्यावर आजही लोक नाचतात. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील हे सर्वांत अविस्मरणीय गाणं मानलं जातं. इतकंच नाही तर लोक आजही या गाण्यातील धर्मेंद्र यांच्या सिग्नेचर स्टेपची नक्कल करतात. हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलं होतं.

पहा ते गाणं-

‘मैं जट यमला पगला दिवाना’ या गाण्याची चाल इतकी उडती होती की ते रेकॉर्ड करताना मोहम्मद रफी यांनाही खूप मजा येत होती. तेव्हा ते त्यात इतके रमून गेले होते की रेकॉर्डिंग स्टुडिओमध्येच नाचू लागले होते. रेकॉर्डिंगनंतर रफी धर्मेंद्र यांना म्हणाले, “बघा, मी माझं काम केलंय, आता या गाण्यात जीव ओतण्याची जबाबदारी तुमची आहे.” त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन धर्मेंद्र यांनीसुद्धा त्या गाण्यावर कमालीचा डान्स केला होता.

‘प्रतिज्ञा’ या चित्रपटात इम्तियाज खान आणि अजित खान यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यात या दोघांमध्ये वडील आणि मुलाचं नातं होतं, तर चित्रपटातही ते बापलेकाच्या भूमिकेत झळकले होते. हा चित्रपट धर्मेंद्र यांच्या करिअरमधील सर्वांत यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये ते चार वेगवेगळ्या लूकमध्ये दिसले होते. तर हेमा मालिनी यांनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यावेळी 80 लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता. तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 3.5 कोटी रुपयांची कमाई केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *