हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही गाणी अशी असतात की ती केवळ चित्रपटगीत म्हणून मर्यादित राहत नाहीत तर संस्कृती, परंपरा आणि भावनांचे प्रतीक बनतात. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लम्हे’ या चित्रपटातील ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे त्यापैकीच एक मानले जाते.
तब्बल 35 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादरीकरणांमध्ये ते आजही आवर्जून ऐकायला मिळते. या गाण्यावर अभिनेत्री श्रीदेवी यांनी केलेला देखणा नृत्याविष्कार आणि त्यांची मोहक अदा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
विशेषतः तरुणींमध्ये हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. अनेकांना माहीत नसलेली बाब म्हणजे या गाण्याची मुळे राजस्थानच्या लोकसंस्कृतीत रुजलेली आहेत. राजस्थानातील बंजारा समाजाच्या लोकपरंपरा आणि लोकगीतांपासून प्रेरणा घेऊन या गाण्याची निर्मिती करण्यात आली होती.
पूर्वी रोजगारासाठी दूर गेलेल्या प्रियकरांच्या विरहात महिला आपल्या भावना लोकगीतांमधून व्यक्त करत असत. ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे त्याच विरह, प्रतीक्षा आणि प्रेमाच्या भावनांचे प्रतीक मानले जाते.
आजही ‘मोरनी बागा मा बोले’ हे गाणे केवळ एक सुपरहिट चित्रपटगीत नसून राजस्थानी संस्कृतीचा अभिमान आणि भारतीय संगीत वारशाचा अमूल्य ठेवा म्हणून ओळखले जाते.




