Health: दूषित पाण्यामुळे नवी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात, मुलांमध्ये वाढतेय संसर्गाची भीती, आरोग्य तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती…


Health: गेल्या आठवड्यापासून नवी मुंबईतील काही भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाण्याला दुर्गंधी येणे, गढूळपणा, पाण्याचा रंग बदलणे आणि चव बदलणे अशा तक्रारी रहिवाशांकडून केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पोटाचे विकार, अतिसार, उलट्या, ताप आणि त्वचारोगाच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी धोक्याची घंटा! (Health News)

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी नळातून येणारे पाणी पिवळसर किंवा गढूळ दिसत असून ते पिण्यास अयोग्य असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही कुटुंबांनी खबरदारी म्हणून बाटलीबंद पाणी किंवा पाणी उकळून वापरण्यास सुरुवात केली आहे. तज्ज्ञांच्या मते, दूषित पाण्यात जीवाणू, विषाणू किंवा परजीवी असू शकतात, ज्यामुळे गॅस्ट्रोएन्टरायटिस, टायफॉइड, हिपॅटायटिस-ए आणि इतर जलजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून इतर आजारांनी ग्रस्त असलेले रुग्णांना याचा अधिक धोका असतो.

पोटाचे विकार दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकल्यास…

डॉ. श्रीराम रघुनाथ नावडे (वरिष्ठ फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई) म्हणाले, दूषित पाण्यामुळे सर्वाधिक प्रमाणात अतिसार, उलट्या, पोटदुखी आणि ताप यांसारख्या तक्रारी दिसून येतात. सतत जुलाब किंवा उलट्या झाल्यास शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते, जी गंभीर ठरू शकते. नागरिकांनी पाणी गाळुन व उकळूनच प्यावे. पोटाचे विकार दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकल्यास किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास तातडीने वैद्यकिय सल्ला घ्यावा.

पोटाच्या संसर्गाच्या तक्रारींमध्ये सुमारे 15 ते 20 टक्के वाढ

डॉ. अमित पी. घावडे( बालरोग व नवजात शिशू तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई) सांगतात की, लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसल्याने दूषित पाण्यामुळे त्यांना अतिसार, उलट्या आणि तापाचा त्रास लवकर होऊ शकतो. सध्या ओपीडीत दाखल होणाऱ्या 100 पैकी 15 मुलांमध्ये दुषित पाण्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या आढळून येत आहे. दुषित पाण्यामुळे होणाऱ्या अतिसारामुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन वेगाने वाढू शकते तर पोटाच्या संसर्गाशी संबंधित तक्रारींमध्ये सुमारे 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. पालकांनी विशेष खबरदारी घेत मुलांना उकळलेले, स्वच्छ पाणी द्यावे, मुलांना हातांची स्वच्छता बाळगण्यास प्रोत्साहन द्या आणि मुलांमध्ये सुस्ती, डोळे खोल जाणे किंवा लघवी कमी होणे तसेच इतर असमान्य लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

नागरिकांकडून रोष व्यक्त..

नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी नोंदवल्या असून पाण्याची तपासणी आणि पुरवठा यंत्रणेची पाहणी करण्याची मागणी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, समस्या पूर्णपणे सुटेपर्यंत नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून वापरणे, उघड्यावर विकली जाणारी कापलेली फळं व उघड्यावरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

‘अशी’ घ्या काळजी

* पाणी किमान 10 मिनिटे उकळून घ्या व त्यानंतर थंड करुन प्या.
* घरी असलेले वॉटर फिल्टर नियमित स्वच्छ करा.
* हात साबणाने स्वच्छ धुवा.
* उघड्यावरचे अन्न आणि कापलेली फळे यांचे सेवन करणे टाळा.
* अतिसार किंवा उलट्या झाल्यास ओआरएस आणि पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करा.
* लक्षणे गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :

Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *