Rajat Patidar On Qualifier 1: आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि गुजरात टायटन्सचा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने आता गुजरातच्या संघाला इशारा दिला आहे.

रजत पाटीदारचे मोठे विधान
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने क्वालिफायर 1 च्या आधी गुजरातला एक खुले आव्हान दिले आहे. तो म्हणाला, “आमची गोलंदाजी ही आमची सर्वात मोठी ताकद आहे आणि सर्वांना माहीत आहे की भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड आणि रसिक सलाम यांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हा एक मोठा सामना आहे आणि जो संघ चांगला खेळेल तो जिंकेल. पण आम्ही इथे आक्रमण करण्यासाठी आलो आहोत, बचाव करण्यासाठी नाही. आमचे लक्ष जलद विकेट्स घेण्यावर असेल. भुवनेश्वर, हेझलवूड आणि रसिक यांनी सातत्याने ही भूमिका बजावली आहे आणि संघाला आशा आहे की ही कामगिरी अशीच सुरू राहील.”
Rohit Sharma: पद्मश्री पुरस्कार सोहळ्याला रोहित शर्मा अनुपस्थित का राहिला? कारण समोर
पाटीदार म्हणाला, “आम्हाला जी काही खेळपट्टी आणि परिस्थिती मिळेल, त्यात आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. खेळपट्टी कशी असावी हे ठरवणे माझ्या हातात नाही.” आयपीएलचा अंतिम सामना बेंगळूरुहून अहमदाबादला हलवण्याबद्दल विचारले असता, पाटीदार म्हणाला, “हे माझ्या नियंत्रणात नाही. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे, त्यामुळे अंतिम सामना जिथे होईल तिथेच खेळला जाईल. सध्या आमचे संपूर्ण लक्ष अंतिम फेरीत पोहोचण्यावर आहे.”
भुवनेश्वर कुमारची शानदार कामगिरी
भुवनेश्वर कुमारने या मोसमात आरसीबीसाठी आपल्या स्विंग गोलंदाजीने कहर केला आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये 24 बळी घेतले असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गुजरात टायटन्ससाठी भुवनेश्वरविरुद्ध सावधपणे खेळणे महत्त्वाचे असेल, कारण पॉवरप्लेमध्ये एक-दोन बळी संघाला अडचणीत आणू शकतात.
आरसीबीने गेल्या मोसमात पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आरसीबी 11 व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचली आहे, परंतु आतापर्यंत फक्त एकदाच विजेतेपद पटकावले आहे. आता दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणे हे त्यांचे ध्येय असेल. गुजरात, राजस्थान आणि हैदराबादसारखे संघही याच विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. क्वालिफायर 1 सामना हा घर्मशाळा, पंजाब येथे रंगणार आहे.
