गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बंडखोरी केलेल्या सहा खासदाराच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य करत या खासदारांना गंभीर इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांच्या विलिनीकरणाला लोकसभा सचिवालयाने मंजूरी दिली आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले की, ‘कोणताही सदस्य विलिनीकरण करत नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित कायदेशीर आधार नाही. याबाबत शिवसेना कायदेशीर लढाई निश्चित लढली जाईल.’ लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र देण्यात आले होते, त्या पत्राला उत्तर देण्यात आले का याबाबत प्रश्न विचारला असता दानवे यांनी म्हटले की, उत्तर मिळालेलं नाही. म्हणजे लोकशाही, नियम, कायदे गोंधळून ठेवले जात आहेत. त्यामुळे नियम आणि कायदे बनवले तरी कशाला. आम्ही निश्चितच कायदेशीर लढाई लढणार आहोत. असं थोडीच सोडणार आहे आम्ही.
शिवसेनेची ताकद वाढली
लोकसभा सचिवालयाने बंडखोर 6 खासदारांच्या वेगळ्या गटाला शिंदे गटातील विलिनीकरणास मंजुरी दिली आहे. ओमराजे निंबाळकर (धाराशिव), संजय (बंडू) जाधव (परभणी), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व) हे सहा खासदार हे आता शिंदे यांच्या पक्षाचाच भाग असणार आहेत. या विलिनीकरणाच्या निर्णयामुळे शिंदे गटाचे लोकसभेतील बळ देखील वाढले आहे.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
6 खासदारांच्या विलीनिकरणाला मंजूरी मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले होते, मात्र आता 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर फक्त 3 खासदार उरले आहे. यामुळे ठाकरेंचे लोकसभेतील संध्याबळ कमी झाले आहे.