Rohit Sharma Retirement: भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना काल कार्डिफ येथे खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 4 विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून आता लॉर्ड्सवरील तिसरा वनडे निर्णायक ठरणार आहे. याचदरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma Retirement) याच्या निवृत्तीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे होणारा तिसरा आणि निर्णायक वनडे सामना हा रोहित शर्माचा भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो, असा दावा विविध माध्यमांच्या अहवालांमध्ये करण्यात आला आहे. एका अहवालानुसार, भारतीय निवड समितीने 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला असून, रोहित शर्मा भविष्यातील योजनांचा भाग नसल्याचे त्याला कळवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धची सध्याची वनडे मालिका त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरची मालिका ठरू शकते. मात्र, रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत किंवा त्याला संघाबाहेर करण्याबाबत बीसीसीआयकडून (BCCI) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी रोहित शर्माला तू भविष्यातील योजनांचा भाग नसल्याचे कळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Rohit Sharma Marathi News)
🚨 NO ROHIT SHARMA FOR WORLD CUP. 🚨
– Lord’s could be Rohit’s final ODI as the selectors have conveyed him he’s not part of the 2027 World Cup plans. (Express Sports). pic.twitter.com/7Mg7Cki2TV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 16, 2026
दरम्यान, कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल आपल्या बाजूने फिरवण्याची क्षमता असलेल्या रोहित शर्मासारख्या खेळाडूला अचानक भविष्यातील योजनांमधून का वगळले जात आहे? याची तीन प्रमुख कारणे समोर आली आहेत.
1. फिटनेस- रोहित शर्माच्या भविष्याबाबतच्या शंकांचे सर्वात मुख्य कारण म्हणजे त्याची फिटनेस (शारीरिक तंदुरुस्ती). गेल्या वर्षभरात त्याने आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आणि वजनही कमी केले असले, तरी दुखापतींनी त्याचा पिच्छा सोडलेला नाही. 2026 च्या आयपीएल (IPL) दरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली, ज्यामुळे त्याला पाच सामने खेळाता आले नाहीत. त्यानंतर, अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वीही त्याच्या फिटनेसबाबत सतत चर्चा होत राहिली. परिणामी, निवडकर्त्यांसाठी त्याची दीर्घकालीन उपलब्धता ही चिंतेची बाब बनली आहे.
2. फॉर्मची समस्या- फिटनेसव्यतिरिक्त, रोहित शर्माच्या अलीकडील फलंदाजीच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2026 मधील एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची कामगिरी अपेक्षांनुसार झालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांपैकी एकाही सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. या वर्षी, त्याने आठ डावांमध्ये 30.12 च्या सरासरीने केवळ 241 धावा केल्या आहेत. शिवाय, कर्णधारपद सोडल्यापासून त्याच्या स्ट्राईक रेटमध्ये सातत्याने घट झाली आहे. पॉवरप्लेमध्ये तो पूर्वी 120 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करायचा, परंतु आता हा आकडा 90 च्या खाली आला आहे.
3. तरुण खेळाडूंचे आव्हान- रोहित शर्मासमोरील तिसरे मोठे आव्हान म्हणजे टीम इंडियाकडे उपलब्ध असलेली तरुण खेळाडूंची फळी. यशस्वी जैस्वालने सलामीच्या जागेसाठी प्रबळ दावेदारी सादर केली आहे. त्याने अवघ्या सहा एकदिवसीय सामन्यांत दोन शतके झळकावली असून त्याची सरासरी 70 पेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, इशान किशननेही एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे; त्याच्या नावावर 45 पेक्षा जास्त सरासरीने 1092 धावा आणि एका द्विशतकाची नोंद आहे. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून त्याची अतिरिक्त उपयुक्तता त्याच्या निवडीची दावेदारी अधिक बळकट करते. हे पाहता, भविष्याचा विचार करून संघ व्यवस्थापन तरुण खेळाडूंवर विश्वास दाखवण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातम्या: