आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात टी20 सीरीजमध्ये टीम इंडियाने खूप खराब प्रदर्शन केलं. त्याचा आढावा घेण्यासाठी बीसीसीआयने बैठक बोलावली आहे. गरज पडल्यास काही निर्णय घेतले जाऊ शकतात. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तात्काळ, घाईगडबडीत कुठले निर्णय घेण्यापासून बीसीसीआयला सावध केलं आहे. निर्णय प्रक्रियेचे अधिकार असलेल्यांनी घाईगडबडीत निर्णय टाळा असा सल्ला त्यांनी दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप जिंकला. तिसऱ्यांदा भारताने ही ट्रॉफी उंचावली होती. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना गमावला नाही. तीच टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंडसमोर ढेपाळली. आयर्लंड विरुद्धची मालिका 2-0 ने तर इंग्लंड विरुद्धची सीरीज 4-0 ने गमावली.
सध्याच्या टीममध्ये सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या नव्हते. सूर्यकुमारला खराब फॉर्ममुळे संघाबाहेर करण्यात आलं आहे. बुमराहला विश्रांती दिलेली, तर हार्दिक पंड्याला दुखापत झालेली. नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यरला सहापैकी एकही मॅच जिंकता आली नाही. त्याच्या नावावर एका खराब रेकॉर्डची नोंद झाली. त्यांच्या नेतृत्वावर टीकाकारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. सुनील गावस्कर यांच्या मते अशा स्थितीत घाईगडबडीत कुठला निर्णय घेतल्यामुळे फायद्यापेक्षा तोटा जास्त होऊ शकतो.
गावस्कर आपल्या कॉलममध्ये काय म्हणाले?
“बीसीसीआय बैठकीद्वारे या पराभवाचा आढावा घेणार आहे. अशा चर्चा सुरु आहेत की, काही जणांवर कारवाई होऊ शकते. हे असं करण जरा जास्तच कठोर होईल. चार महिन्यांपूर्वीच टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आहे. आयसीसी रँकिंगमध्ये ते दुसऱ्या स्थानावर आहेत” असं स्पोर्टस स्टार साठीच्या स्तंभात गावस्कर यांनी लिहिलं आहे.
त्यांना संघर्ष करावा लागला
आयपीएलमध्ये ज्या फलंदाजांनी यश मिळवलं. प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलर्सची गोलंदाजी फोडून काढली. तेच फलंदाज परदेशातील स्विंग होणाऱ्या खेळपट्ट्यांवर ढेपाळले. त्यांना संघर्ष करावा लागला. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर हे आपपाल्या फ्रेंचायजीसाठी जबरदस्त खेळले. पण परदेशातील खेळपट्ट्यांवर त्यांच्या कमतरता उघड झाल्या.