Kamali Zee Marathi Serial: ‘कमळी’ मालिका (Kamali Marathi Serial) सध्या अत्यंत मनोरंजक वळणावर आली आहे. कमळी (Kamali Serial) पुन्हा अन्नपूर्णा हाऊसमध्ये परतली असून कमळी आणि कामिनी यांच्यात थरारक सामना रंगला आहे. तर साई भंडाऱ्याच्या मंगलमय वातावरणात नियती कमळी आणि सरोजला पुन्हा एकदा समोरासमोर आणणार आहे. याआधी सरोजवर झालेल्या गोळीबारानंतर तिच्या पात्राचं पुढे काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. या संपूर्ण ट्रॅकच्या चित्रीकरणाबद्दल सरोजची भूमिका साकारणारी योगिनी चौक हिनं तिचा अनुभव शेअर केलाय.
अभिनेत्री योगिनी चौक (Actress Yogini Chauk) म्हणाली, “सरोजला गोळी लागल्यानंतर मलाच वाटू लागलं होतं की, आता माझं पात्र मालिकेतून संपणार की काय… पुढे कथेत काय होणार? याची आम्हा कलाकारांनाही कल्पना नसते. त्यामुळे मी आमच्या क्रिएटिव्ह टीमला विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, सरोजला गोळी लागेल, पण ती वाचणार आहे. गोळी लागण्याचा सीन मी आयुष्यात पहिल्यांदाच केला. त्यामुळे मी खूप उत्सुक होते. पडद्यावर तो प्रसंग खरा वाटावा यासाठी शरीराची हालचाल, चेहऱ्यावरील भाव आणि प्रत्येक गोष्टीकडे मी विशेष लक्ष दिलं. आमचे दिग्दर्शक यांनी प्रत्येक बारकावा समजावून सांगितला. त्यामुळे हा सीन करताना खूप काही शिकायला मिळालं. रक्त उडण्याचा इफेक्ट आणि संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया प्रत्यक्ष पाहणं हा वेगळाच अनुभव होता. मात्र, सरोजच्या पात्रावर एवढं संकट येताना अभिनेत्री म्हणून मला खूप वाईटही वाटलं. त्या दिवशी मी भावूक झाले होते. पण मनात विश्वास होता की, सरोज पुन्हा परत येईल. हा भाग प्रसारित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून आणि मित्रांकडून खूप मेसेज आणि फोन आले. ‘सरोज आता मरणार का?’, ‘तू आता मालिकेत नाहीस का?’, ‘नवीन मालिका स्वीकारलीस का?’ असे अनेक प्रश्न मला विचारले गेले. तेव्हा मी फक्त एवढंच सांगायचे की, थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येणार आहे…”
साई भंडाऱ्यातील आणि गोळी लागल्यावर पडण्याचा सीनही तितकाच आव्हानात्मक होता. कमळी माझा हात पकडते आणि माझा हात निसटतो, हा प्रसंग खरा वाटावा यासाठी आम्ही अनेक रिटेक्स केले. अशा स्टंट सीन्सचं चित्रीकरण कसं केलं जातं, हे त्या दिवशी जवळून शिकायला मिळालं. हा संपूर्ण अनुभव खूप शिकण्यासारखा होता. त्यासाठी मी आमचे लेखक, दिग्दर्शक आणि संपूर्ण निर्मिती टीमची मनापासून आभारी आहे.
साई मंदिरातील प्रसंगात कमळीला तिची आई जिवंत असल्याची जाणीव होऊ लागते आणि त्यानंतर कमळी आणि सरोज यांची भेट घडते. सरोज कशी वाचते, हेही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अपघातानंतर तिची स्मरणशक्ती कमी झालेय, तिला काही ठरावीक काळातल्या गोष्टी आठवतात, आणि ती जणू काही काळ मागे थांबल्यासारखी का वागते, हेही येणाऱ्या भागांमध्ये उलगडणार आहे. आता कमळी आणि सरोजचं नातं पुढे कोणतं वळण घेतं, हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूप मनोरंजक ठरणार आहे. आता कमळी–सरोजची ही भेट पुढे काय घडवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :