राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. यात काही मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. अशातच आता अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. अजित दादांच्या निधनापूर्वी अजित दादांकडे हे अर्थखातं होतं, मात्र अजित दादांच्या निधनानंतर अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवलेले आहे. मात्र गेल्या काळापासून राष्ट्रवादीने हे खातं पुन्हा आपल्याकडे मागितले असल्याचे समोर आलेले आहे. मात्र अद्याप हे खातं राष्ट्रवादीला देण्यात आलेले नाही. अशातच आता एका बड्या नेत्याने लवकरच हे खातं राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा दावा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
15 दिवसात अर्थमंत्रिपदाचा निर्णय होणार – संजय काकडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राज्यातील अर्थमंत्री पदाचा निर्णय 15 दिवसात होईल असं काकडे यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.
कायदेशीर नोटीस नाही…
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या पदाबाबत नोटीस पाठवण्यात आलेली आहे. यावर बोलताना संजय काकडे यांनी म्हटले की, ‘ही कायदेशीर नोटीस नाही, बेकायदेशीर आहे. सगळी प्रक्रिया पार पाडून पक्षातील सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्या अध्यक्ष झाल्या आहेत. काही आत्मे असंतुष्ट असतात, त्याचे असले कटकारस्थान असू शकते, कायद्यात कुठलीही उणीव ठेवली नाही, हा तात्पुरता विषय आहे, त्यात काही तथ्य नाही.’
कोणीही नाराज नाही…
राष्ट्रवादीतील मतभेदांवर बोलताना काकडे यांनी म्हटले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कोणी नाराज नाही. तटकरे-पटेल नाराज नाही. वहिनींना दादांची कार्यपद्धती राबवण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. गेले अनेक वर्ष दादा राज्यात काम करत होते. त्यामुळे पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांना वेळ लागेल. भुजबळ, पटेल, तटकरे सगळे नेते महाराष्ट्र पिंजून काढतील. सगळे एकदिलाने काम करतील. येणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी काम सुरू आहे.’