मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुल गांधी यांनी पेपर फुटीवरुन केलेल्या टीकेला उत्तर दिलं. त्याचवेळी ते शेतकरी कर्जमाफी योजनेचा कसा फायदा होणार आहे हे सुद्धा त्यांनी विस्ताराने सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा रामरक्षा आंदोलनावरुन टीका केली.”पेपरफुटीबद्दल राहुल गांधींना कदाचित कल्पना नसेल की सरकारने कारवाई करुन पेपर फोडणाऱ्यांना पकडलं आहे. म्हणून ती परिक्षा पुढे गेलीय. पेपर फुटल्यानंतर नाही त्याआधी महाराष्ट्र सरकारने पोलिसांनी कारवाई केली आहे. निश्चित पुढची परीक्षा योग्य पद्धतीने होईल. नियोजन चालू आहे. त्याच्या तारखा लवकरच घोषित करु” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “राहुल गांधींनी हे टि्वट देशातून केलय की परेदशातून ते माहित नाही. बऱ्याचदा ते परदेशात असतात. राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केलेत, मला वाटतं की आधीच या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. पकडले गेलेले गुन्हेगार आंतरराज्यीय गुन्हेगार निघाले आहेत. त्यांनी इतर राज्यातही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. इतर राज्यातील पेपर फुट वाचवण्याचं काम आपल्या सरकारने केलय. राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाकडे, सरकारकडे बघावं नंतर बोलावं” असं देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं.
“मी विधानसभेत घोषणा केली होती. आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात, त्यांना अपात्र करण्यात आलं. यावेळी आम्ही त्यांना 50 हजारापर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला. रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ताधारी पक्षाचे आमदार भेटले. त्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी. म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात कर्जमाफीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरी जी अट होती 26-27 चे पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27 ची अट काढून टाकली आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे हे हताश, फ्रस्ट्रेड व्यक्ती
रामरक्षा आंदोलनावरुन त्यांनी उद्धव ठाकरेंचा सुद्धा समाचार घेतला. “माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी किमान दोन पान रामरक्षेची वाचावी. रामाच्या नावाने आंदोलन करणं योग्य नाही. मागच्यावेळी ते रामरक्षा वाचू शकले नव्हते. त्यांची तयारी असेल तर मी सुद्धा त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा येत नसती, तर किमान वाचता तरी आली पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षा वाचता येत नाही. कुठलं आंदोलन आहे तुमचं” अशा शब्दात त्यांनी टीका केली. उद्धव ठाकरे हे हताश, फ्रस्ट्रेड व्यक्ती आहेत अशी टीका सुद्धा फडणवीसांनी केली.