मुंबई : राज्यात गेल्या 5 दिवसांत मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पुणे-मुंबई वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला होता. त्यातच, दोन दिवसांपूर्वी मिसिंग लिंकवरदेखील (Missing Link) भूस्खलन झाल्याने हा मार्ग देखील जवळपास 20 तास प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यावरुन, मोठ्या प्रमाणात सरकारवर टीका करण्यात आली. 7 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या पुलात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मिसिंग लिंकच्या टीकेवरुन होत असलेल्या ट्रोलिंगला उत्तर दिलंय. तसेच, नाशिकच्या ढगफुटीवरुनही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टोला लगावला.
मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई कनेक्टींग लिंक विषय समोर आला, एवढे खोटारडे लोक पैदा झाले आहेत, 1 हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील, असे म्हणत मिसिंग लिंक प्रकरणावरुन होणाऱ्या टीकेला फडणवीसांनी विधानसभा सभागृहात उत्तर दिलं. जयंतराव तुम्ही हसू नका, महायुतीत हिंमत होती म्हणुन कनेक्टिंग लिंक बांधली. कोकण रेल्वेही तशीच सुरु केली, जर ती सुरु केली नसती तर असंच राहिलं असतं. मागच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंक करता येत नाही म्हणून 2 पाने लिहून 14 कारणे दिले होती, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
कनेक्टिंग लिंक ही फक्त लिंक नाही तर इंजिनिअरिंग मार्बल तयार झालं आहे, भारताताला सर्वात उंच पुल आणि जगातला सर्वात मोठा बोगदा आपण तयार केला. त्यामुळे सर्व घाट सेक्शन संपला, सर्व अपघात संपले. येथे पावसामुळे दरडीचा मलबा खाली आल्याने कमान पडली, यास कुठेही क्रॅक गेला नाही. मात्र, विरोधकांनी असं दाखवायला सुरुवात केली की सात हजार कोटी पाण्यात गेले. पण, 18 तासात वाहतुकीसाठी रस्ता सुरू झाला, तेही नाकावर टिच्चून असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांनी डिवचले.
पैसे घेऊन सोशल मीडियावर शिव्या देतात
देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, चालेल त्याची सवय आहे, मी शिव्याप्रुफ आहे. जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी शिव्या देणारे दिसणार नाहीत मात्र ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचं नाव असेल, असे म्हणत फडणवीसांनी ट्रोलर्संना सुनावले. पैसे घेऊन सोशल मीडियावर शिव्या देतात, त्यांनाही सांगू इच्छितो, माझी बदनामी करा चालेल, पण महाराष्ट्र बदनाम कराल तर कोणालाही सोडणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्रोलर्संना जोरदार ठणकावले आहे. तसेच, काही लोक काय खावून येतात हे माहीत नाहीस, सभागृहात हा विषय येईल, आमचे आंदोलन मोठे होईल म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाशिकचा पाऊस सांगितल्याचं म्हणतात, पण आज नाशिकला मोठा पाऊस सुरू आहे, असे म्हणत फडणवीसांनी नाव न घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही लक्ष्य केलं.
वसई-विरारची परिस्थिती बिकट
वसई विरारची परिस्थिती बिकट आहे, 72 तासांत 772 मिमी पावसाची नोंद झाली आहे, येथील मोबाईल नेटवर्क गेले आहे. मोबाईल कंपनींसोबत चर्चा झाली आहे, इलेक्ट्रिसिटी डॅमेज झाली आहे, ते काम सुरु केले आहे. कोकण क्षेत्रातील प्रभावित जिल्ह्यात तातडीचा निधी दिला आहे, काही ठिकाणी जेवण देण्यापासून काम करावे लागणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. जेन पोर्टलचा वापर केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. विनाकारण फुगवलेले टेंडर स्वीकारायचे नाहीत हा निर्णय घेतला आहे. काही निविदा होत्या, त्यांचा विचार करून 1 हजार 032 कोटी रुपयांच्या निविदा रद्द केल्या आहेत, असेही त्यानी सांगितले.
हेही वाचा