1970 च्या दशकात महेश भट्ट हे अध्यात्मिक गुरू रजनीश उर्फ ओशो यांचे अनुयायी बनले होते. ते सतत त्यांच्या पुण्याच्या आश्रमात जात होते. मात्र काही काळानंतर त्यांनी ओशोंना मानणं सोडून दिलं होतं. यामुळे ओशोंसोबतच्या त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. नंतर अध्यात्मिक आधाराच्या रुपात त्यांना अँटी गुरू यू. जी. कृष्णमूर्ती भेटले. महेश भट्ट यांची मुलगी आणि अभिनेत्री पूजा भट्ट नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. जेव्हा तिचे वडील ओशोंपासून दूर गेले, तेव्हा त्यांच्यासोबत काय घडलं, याविषयी तिने सांगितलं.
‘सायरस सेज’ पॉडकास्टमध्ये पूजा भट्ट म्हणाली, “माझे वडील रजनीश संप्रदायाचा भाग होते. त्यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यातली माळा काढली आणि टॉयलेटमध्ये फेकून दिली. नंतर त्यांच्यावर बंदी आणण्यात आली होती. ते त्यातून बाहेर पडणारे अपराधी बनले होते. मला अजूनही आठवतंय की, विनोद खन्ना यांच्या माध्यमातून माझ्या आईला एक संदेश आला होता. त्यात म्हटलं होतं की, देव खूप नाराज आहेत. देव महेश भट्ट यांना उद्ध्वस्त करतील. जेव्हा मी छोटी होती, तेव्हा आम्हाला मध्यरात्री पुण्यातील एका सुरक्षित घरी नेण्यात आलं होतं.”
पूजा भट्टने ओशो यांना एक निराश प्रेमी म्हटलं. ती म्हणते की, ओशो लोकांना स्वत:पासून दूर जाताना पाहू शकत नव्हते. माँ आनंद शीला यांच्याबाबतीतही असंच होतं. अखेरीस “तुम्ही मला त्या सिंहासनावर का बसवू शकत नाही”, ही भीती कायम राहते. संत असो वा राजकारणी, त्यांना पूजा हवी असते. माँ आनंद शीला या दीर्घकाळ ओशोंच्या एकनिष्ठ सचिव होत्या. याविषयी पूजा पुढे म्हणाली, “मी ओशोंच्या आश्रमात गेले आहे. लहानपणी मी त्यांच्या पायांना स्पर्शही केला होता. ते तुमचा वास घ्यायचे, कारण देवाला कोणाचाच सुगंध पसंत नव्हता, त्यांच्या तेजाचा प्रभाव सर्वांवर पडत होता. तुम्ही परफ्युम किंवा शॅम्पूसुद्धा वापरू शकत नव्हते.”
काही वर्षांपूर्वी महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते ओशोंचे अनुयायी कसे बसले होते? काही चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ते ओशो रजनीश यांच्याकडे गेलो होते. “त्यांना भेटल्यानंतर मी स्वत:ला त्यांच्यासाठी समर्पित केलं होतं. ओशोंची माळा परिधान केल्यानंतरही माझ्यात ईर्ष्येची भावना होती, पण मी चांगले शब्द बोलत होतो. फक्त हेच कारण होतं की मी ती माळा टॉयलेटमध्ये फेकली होती”, असं ते म्हणाले होते.