होळीचा सण आला की सर्वप्रथम आठवण होते ती रंगांची, आनंदाची आणि बॉलिवूडच्या सदाबहार होळी गाण्यांची. अनेक नवीन गाणी दरवर्षी प्रदर्शित होत असली तरी गेल्या तब्बल 45 वर्षांपासून एक गाणे आजही होळीचा अविभाज्य भाग बनून राहिले आहे. या गाण्याची धून कानावर पडताच पाय आपोआप ताल धरू लागतात आणि संपूर्ण वातावरण रंगांच्या उत्साहात न्हाऊन निघते. हे गाणे म्हणजे ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’.
हे गाणे केवळ होळीचे सर्वात लोकप्रिय गाणं ठरले नाही, तर बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रेमकथांपैकी एक असलेल्या अमिताभ बच्चन, रेखा आणि जया भादुरी यांच्या नात्याच्या चर्चांनाही नव्याने उजाळा देणारे ठरले. पडद्यावरील या तिघांची उपस्थिती आणि होळीच्या प्रसंगातील दृश्यांनी त्या काळात मोठी खळबळ उडवली होती.
‘सिलसिला’पेक्षा गाजले ‘रंग बरसे’
1981 साली प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’ हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी त्यातील ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरले. कालांतराने हे गाणे चित्रपटापेक्षाही अधिक गाजले आणि होळीच्या प्रत्येक उत्सवाचा अविभाज्य भाग बनले.
आजही सोसायट्यांमधील होळीचे कार्यक्रम, मित्रमंडळींच्या पार्ट्या, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा मोठे सार्वजनिक उत्सव असोत, ‘रंग बरसे’शिवाय होळीचा आनंद अपूर्णच वाटतो. गाणे सुरू होताच संपूर्ण वातावरण रंग, उत्साह आणि जल्लोषाने भरून जाते.
अमिताभ, रेखा आणि जया यांच्या सीनने रंगल्या चर्चा
‘रंग बरसे’ हे गाणे केवळ संगीतामुळेच नाही तर त्यातील दृश्यांमुळेही कायम चर्चेत राहिले. त्या काळात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कथित नात्याबाबत गॉसिप मासिकांपासून चित्रपटसृष्टीपर्यंत विविध चर्चा रंगल्या होत्या.
अशा परिस्थितीत या गाण्यात अमिताभ बच्चन रेखा यांना रंग लावताना दिसतात तर काही अंतरावर उभ्या असलेल्या जया भादुरी शांतपणे हा सीन पाहताना दाखवल्या आहेत. या प्रसंगामुळे प्रेक्षकांचे लक्ष चित्रपटाच्या कथानकापेक्षा या तिन्ही कलाकारांकडे अधिक वेधले गेले.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही अनेक दिवस या सीनची चर्चा सुरू होती. काहींनी याला उत्कृष्ट अभिनयाचे उदाहरण म्हटले, तर काहींना पडद्यावर वास्तव आयुष्याची झलक पाहायला मिळाल्याची भावना व्यक्त केली. अमिताभ बच्चन, रेखा किंवा जया भादुरी यांनी या चर्चांवर कधीही अधिकृतपणे भाष्य केले नसले, तरी या गाण्यातील हा प्रसंग बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या ऑनस्क्रीन क्षणांपैकी एक मानला जातो.