Nagpur Railway Crime News: महिलांसाठी रेल्वेचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र नागपुरातील काही महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रेल्वेचा प्रवास आयुष्यातला सर्वात वाईट आणि कटू अनुभव ठरला आहे. 27 जून रोजी नागपूरातील काही महिला आपापल्या कुटुंबासोबत बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही पर्यटन स्थळ फिरण्यासाठी गेल्या होत्या. 3 जुलैच्या रात्री (3 आणि 4 जुलै ची मध्यरात्र) उत्तर प्रदेशातील वाराणसी मधून या सर्वांचे परतीचे आरक्षण होते.
रात्रीच्या सुमारास वाराणसी रेल्वे स्टेशनवरून दानापुर-सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी जेव्हा या महिला आपल्या कुटुंबासोबत पुढे सरसावल्या. तेव्हा त्यांच्या रिझर्वेशन असलेल्या डब्यात 72 ऐवजी 400 पेक्षा जास्त अनधिकृत पद्धतीने लोक शिरलेले पाहायला मिळाले. त्यामुळे अगदी दारातून डब्यात प्रवेश घेणे कठीण होऊन बसले. मोठ्या प्रयत्नानंतर छेडखानी आणि विनयभंगाला सामोरे जात महिलांनी कसंतरी रेल्वे डब्यात प्रवेश घेतलं.
तक्रार करुनही रेल्वेकडून काहीच कारवाई नाही- (Physical Harrasment In Railway With Nagpur Women)
दारातून आपल्या सीटपर्यंत जातानाही अश्लील शेरेबाजी, छेडखणीचे प्रकार सहन करावे लागले. त्रस्त झालेल्या या महिलांनी आपल्या कुटुंबीयांसोबत रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांक 139 सह रेल्वेच्या एक्स हँडलवरही तक्रार पाठवली, (feed मध्ये मोबाईल द्वारे केलेल्या तक्रारीचे स्क्रीन शॉट आहे..) आम्ही त्वरित कारवाई करतो असे आश्वासन रेल्वेकडून मिळाले, मात्र काहीच झाले नाही.
पीडित महिलांचा रेल्वे रुळावर जाऊन इंजिन समोर जाऊन आक्रमक पवित्रा- (Physical Harrasment In Railway)
ट्रेन वाराणसीमधून पुढे निघाल्यानंतर शेरेबाजी आणि छेडखानीचे प्रकार वाढल्यामुळे पीडित महिलांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मिळून नैनी रेल्वे स्थानकावर अंधारात रेल्वे रुळावर जाऊन इंजिन समोर आडवे उभे राहून, जोवर छेडखाणी करणाऱ्या आरोपींना पोलीस पकडत नाही, तोवर रेल्वे पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. तेव्हा कुठे रेल्वे पोलिसांचे जवान समोर आले. मात्र 400 जणांच्या गर्दीतून तुमच्याशी छेडखानी करणारे, विनयभंग करणारे आरोपी तुम्हीच ओळखून सांगा असा बेजबाबदार पवित्रा रेल्वे पोलिसांनी घेतला. अनेक प्रयत्न करूनही विनंत्या करूनही रेल्वेचा तिकीट चेकर घटना घडलेल्या डब्यात आलाच नाही. अखेरीस पीडित महिलांना त्याच डब्यातून नागपूर पर्यंतच्या वीस तासाच्या प्रवास करावा लागला.
रेल्वे डब्यातील लाईट बंद करून झोपी गेलेल्या महिलांसोबत किळसवाणे प्रकार- (Nagpur Railway News)
रेल्वे पोलिसांपासून रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंतही तक्रार केल्यानंतर आपलं काहीही वाकड होत नाही, हे पाहून शेकडोंच्या गर्दीमध्ये असलेल्या आरोपींचे धाडस वाढले. त्यांनी रात्री उशिरा रेल्वे डब्यातील लाईट बंद करून झोपी गेलेल्या महिलांच्या शरीराला जाणून बुजून हात लावणे, जवळ येऊन झोपणे असे किळसवाणे प्रकार केले. अखेरीस पीडित रेल्वे प्रवाशांनी नागपुरात रेल्वेतून उतरल्यानंतर नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे लेखी तक्रार नोंदवली… मात्र नागपूर पोलिसांनी ही तुमची तक्रार उत्तर प्रदेशात जाऊन द्या असे सांगून वेळ मारून नेली. एबीपी माझा समोर आपल्या सोबत घडलेली व्यथा सांगताना या महिलांना रडू कोसळले.
ही बातमीही वाचा: