Nagpur Family Missing : नागपुरात एक विचित्र घटना घडली आहे. येथे एक अख्खं कुटुंबच गायब झालं आहे. अनेक ठिकाणी शोध घेऊनही या कुटुंबातील सदस्य सापडत नाहीयेत. विशेष म्हणजे पोलीसदेखील या कुटुंबाचा शोध घेत असून त्यांनाही यात अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, कुटुंबातील संपूर्ण सदस्यच नाहीसे झाल्यानंतर नागपुरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील पाच जण अचानक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार धंतोली परिसरात तक्रारदार ७१ वर्षीय श्यामसुंदर परसवानी यांचे कुटुंब राहते. त्याच ठिकाणी त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील सदस्य राहतात. या कुटुंबातील 57 वर्षीय हर्षा परसवानी, 42 वर्षीय जितेंद्र परसवानी, 40 वर्षीय इशिता, 21 वर्षीय खुशी आणि 12 वर्षीय कृष्णा यांचा समावेश आहे. हेच संपूर्ण कुटुंब बेपत्ता झाले आहे.
ओळखीच्या व्यक्तीकडे शोधाशोध करून…
तक्रारीत नमूद केल्यानुसार 24 जूनपासून सुरेश परसवानी यांच्या कुटुंबातील पाचही सदस्य अचानक घरातून निघून गेले. त्यानंतर ते परतलेच नाही. एका सदस्यावर कर्जाचा डोंगर असल्याची माहिती पुढे आली आहे. नातेवाईकांसह ओळखीच्या व्यक्तीकडे शोधाशोध करूनही कोणताही माहिती लागला नसल्याने नातेवाईक शामसुंदर परसवाणी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल नोंदवली आहे. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपला तपास सुरू केला आहे.
टोकाचा निर्णय तर घेतलेला नाही ना?
पोलिसांना हाती लागलेल्या आतापर्यंतच्या माहितीनुसार या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथील आहे. परंतु पुण्यातून हे कुटुंब नेमके कुठे गेले. या कुटुंबाने नेमकं काय केल? त्यांनी काही टोकाचा निर्णय तर घेतलेला नाही ना? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. कर्जाची परतफेड करता आली नसल्यामुळे ही लोक बेपत्ता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.