मुंबई : राजधानी मुंबईत गेल्या 5 दिवसांपासून पावसाने (Rain) धुमाकूळ घातला सून अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात झाडं पडल्याच्या घटना घडल्या असून जवळपास 350 झाडे पडल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यातच, आज मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडल्याने सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला आहे. एकीकडे पावसामुळे सगळीकडे दाणादाण उडाली असताना आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि शासनाकडून नागरिकांना महत्त्वाच्या सूचना केल्या जात आहेत. त्यातच, अभिनेता अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी सूचक पोस्ट करत नेमकं कोणाला लक्ष्य केलंय, याची देखील चर्चा होत आहे.
अतुल कुलकर्णी यांनी आपल्य पोस्टमध्ये, निवडणुकांमधील बिनशर्त पांठिब्याचा प्रकार लोकशाहीला घातक असल्याचे म्हटले. ‘बिनशर्त पाठिंबा’ हा लोकशाहीमधला सगळ्यात धोकादायक प्रकार असतो. माझ्या कुठल्यातरी एका ‘अजेंडा’ ला पाठिंबा असणारं, तो राबवणारं सरकार आहे म्हणून त्या सरकारच्या बाकी सगळ्या चुकांना मी पाठीशी घालेन; हा विचार संपूर्ण समाजाबरोबर अंतिमतः स्वतःचा आणि मुख्य म्हणजे पुढच्या पिढ्यांचा घात करणारा असतो हे लक्षात घेतलं पाहिजे, असे म्हणत सरकारच्या चुकांना पाठिशी घालणाऱ्यांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केलीय. अर्थात आपल्या पोस्टमध्ये त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. मात्र, आपली सदसदविवेक बुद्धी ‘कोसळू’ द्यायची का? असा सवाल करत सध्या कोसळणाऱ्या पाऊस आणि दरडींवरुनच त्यांनी ही पोस्ट केलीय का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सदसदविवेक बुद्धी प्रत्येकाला असतेच. ती गहाण टाकून सगळं ‘कोसळू’ द्यायचं का? हा निर्णय मात्र ज्याचा त्याचा… असे म्हणत अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी अप्रत्यक्षपणे सरकारवर टीका केलीय. दरम्यान, अतुल कुलकर्णी यांच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे आहे? ह्याचा अंदाज जो-तो आपल्या राजकीय आकलनातून लावत आहे.
मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाकडून मुंबईला अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून वादळी वाऱ्यांसह समुद्रालाही उधाण येण्याची शक्यता आहे. तसेच यादरम्यान उंच लाटा उसळण्याचा अंदाज असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज दुपारी 3 च्या सुमारास 4.26 मीटर, उंच लाटा असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
नाशिकमध्ये ढगफुटीचा अंदाज
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून साताऱ्यात धुव्वाधार पाऊस पडल्याने काही नद्यांना पूर आला आहे. पुण्यातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने लोणावळा घाटात वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. नाशिकमध्येही ढगफुटीचा अंदाज वर्तवण्यात आला असून नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने कळवणचा पश्चिम पट्टा जलमय झाला आहे. येथील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने सर्वदूर पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, रस्त्यावरील छोट्या पुलांवर पाणी वाहू लागल्याने नागरिकांना रस्ता ओलांडतांना कसरत करावी लागत अडचणी निर्माण होत आहे.
उल्हासनगर, बदलापुरात पाऊस
दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागातील नदी नाल्यांना पाणी आले आहे, अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिर येथून वाहणारी वालधुनी नदी तुडुंब भरून वाहत आहे. तर, मलंगगड भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पाणी आले, वर्षभर या नदीला पाणी नसते मात्र जोरदार पाऊस झाल्यावर ही नदी तुडुंब भरून वाहत असते.
हेही वाचा