हिंदी सिनेमांमध्ये गीतकारांचं अनन्यसाधारण महत्त्व राहिलें आहे. 40-50 च्या दशकात पैसा नसायचा पण गीतकारांना प्रचंड मान असायचा. त्याकाळातील सर्वच गाणी हिट आणि सदाबहार आहेत. आजही ही गाणी गायली जातात. पिढ्या आल्या आणि गेल्या, पण या गाण्यांचा गोडवा तसूभरही कमी झालेला नाही. आनंद बक्शी, मजरूह सुल्तानपुरी, साहिर लुधियानवी आदी एकापेक्षा एक गीतकारांनी तो काळ समृद्ध केला होता. यात एक नाव आवर्जुन घ्यावं लागेल. ते म्हणजे गीतकार राजेंद्र कृष्णन यांचं. त्यांनी अनेक हीट गाणी लिहिली. पण त्यामुळे त्यांची आमदनी वाढली नाही, तर एक जॅकपॉट लागल्याने ते रातोरात श्रीमंत झाले होते. 70च्या दशकात राजेंद्र कृष्णन यांनी घसघशीत रक्कम जिंकली होती. आजच्या काळात ही रक्कम करोडोच्या घरात आहे.
बायको आंघोळ करून आली आणि…
राजेंद्र कृष्णन यांचा फिल्मी सफर अत्यंत समृद्ध असा राहिलेला आहे. त्यांनी करिअरच्या सुरुवातीला 1947मध्ये स्क्रिनप्ले लिहायला सुरुवात केली होती. त्याच वर्षी जुना जंजीर सिनेमा आला होता. या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा गाणी लिहिली होती. हा अमिताभ बच्चन यांचा जंजिर सिनेमा नव्हता. 40च्या दशकापासून ते 80च्या दशकापर्यंत त्यांनी अनेक गाणी लिहिली. धर्मेंद्र यांच्या एका सिनेमासाठी पल पल दिल के पास आणि पडोसन सिनेमासाठी मेरी सामने वाली खिडकी में, खानदानसाठी तुम्ही मेरे मंदिर आणि छायासाठी इतना ना मुझसे प्यार बढा… तर आशासाठी ईना मिना डिका…शहनाईसाठी न झटको जुल्फों से मोती आदी गाणी राजेंद्र कृष्णन यांनी लिहिली होती. गंमत म्हणजे शहनाई सिनेमातील न झटको जुल्फो से मोती… हे गाणं त्यांनी त्यांच्या पत्नीच्या आंघोळीवरून लिहिलं होतं. त्यांच्या सर्वाधिक गाण्यांचं रिमिक्स करण्यात आलेलं आहे. ही गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत.
घोडा धावला अन्…
त्या काळात राजेंद्र कृष्णन यांना सिनेमासाठी गाणं लिहिण्यासाठी हजार रुपये मिळायचे. तर त्याच सिनेमातील अभिनेत्याची फिस 50 हजारापासून ते 2 लाखापर्यंत असायची. यावरून गीतकारांना त्याकाळी तुटपुंजेच मानधन मिळायचं हे स्पष्ट होतं. त्याकाळी राजेंद्र यांना हॉर्स रेसिंगचा प्रचंड शौक होता. घोडेबाजारात सट्टा लावण्यासाठी ते प्रसिद्धही होते. ते त्यांच्या कमाईचा बराच हिस्सा हॉर्स रेसिंगमध्ये लावायचे. एकदा त्यांनी कमाईचा काही भाग हॉर्स रेसिंगमध्ये लावला आणि काय आश्चर्य त्यांना जॅकपॉट लागला. या जॅकपॉटमध्ये त्यांनी एक दोन हजार नव्हे तर 46 लाख रुपये जिंकले. आजच्या काळात ही रक्कम काही करोडच्या घरात आहे. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर राजेंद्र कृष्णन रातोरात श्रीमंत झाले. त्याकाळातील सर्वात श्रीमंत गीतकार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते.
आजच्या काळातील ही रक्कम…
70च्या दशकातील 46 लाख ही मोठी रक्कम होती. आजच्या काळाचा हिशोब केला तर 24 कोटी रुपये होतात. राजेंद्र कृष्णन श्रीमंत गीतकार झाले. नशीब उघडलं. पण असं असूनही गाण्यांमुळेच त्यांची ओळख कायम राहिली. श्रीमंत झाल्यावरही त्यांनी गाणी लिहिणं सोडलं नाही. 1987मध्ये त्यांचं निधन झालं.