पालघर : मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पाऊस (Rain) पडला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यातच, हवामान खात्याने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पुढील 3 दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचेही सांगण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पालघर जिल्ह्यातील वसई आणि विरारमध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसात अनेक वाहने वाहून गेली असून उपनगरातही जोर कायम आहे. त्यातच, हवामान विभागाने पालघर (Palghar) जिल्ह्यासाठी उद्या अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. संभाव्य मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा (School), महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
पालघर जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची जोरदार हजेरी कायम होती. अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोवर झाडाची मोठी फांदी कोसळली
चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेली दुर्घटना ताजी असताना, घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्याजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या टेम्पोवर अचानक झाडाची मोठी फांदी कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हे झाड असल्याने त्याची छाटनी केलेली नव्हती. मात्र, आता पालिकेने ही फांदी कापून बाजूला केली आहे. सुदैवाने चेंबुर अपघाताची पुनरावृत्ती टळली आहे.
मुंबई आणि उपनगरे: सबवे पाण्याखाली, घराबाहेर पडणं कठीण
मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असून दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अंधेरी सबवेमध्ये सुमारे अडीच फुटांपर्यंत पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला. वीरा देसाई रोडही पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. गोरेगावच्या फिल्म सिटी रोड आणि संतोषनगर परिसरातील मुख्य रस्त्यांवर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहनचालकांची मोठी कोंडी झाली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरीजवळ एसआरपीएफ कॅम्प समोर 2 ते 3 फूट पाणी साचल्याने महामार्गावरील वेग मंदावला. वरळी भागात आणि चेंबूरमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले.
ठाण्यातही सकाळपासून पावसाची बॅटिंग
ठाण्यात ऑरेंज अलर्ट दिल्याप्रमाणे सकाळपासून पावसाची जोरदार बैटिंग बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले होते पण त्याचा निचरा लवकर झाल्याने दैनंदिन कामांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. आत्तापर्यंत 90 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. रात्रीदेखील पावसाचा जोर असाच राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुंबईहून घोडबंदर रोड, कल्याण, नाशिककडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
हेही वाचा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह