अभिषेक बच्चनने नुकतेच बॉलिवूड इंडस्ट्रीत 26 वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचा पहिला ‘रेफ्युजी’ हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने करीना कपूरसोबत मुख्य भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक त्याच्या या प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इतक्या वर्षांत अभिनेता म्हणून त्याचा आत्मविश्वास कसा वाढला, त्याच्यात कोणते बदल झाले, याविषयी त्याने सांगितलं.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “फक्त एकच बदल झाला आहे की आता मला अधिक सहज आणि आत्मविश्वास वाटतो. मला वाटतं की मी जेव्हा सुरुवात केली, तेव्हा मी थोडा अस्वस्थ होतो. पण आता मी कॅमेरासमोर अधिक सहजपणे वावरतो. जेव्हा तुम्ही जसे आहात तसे वागता आणि स्वत:मध्ये सहजपणा आणता, तेव्हा तुम्हाला घ्यायच्या निर्णयांबद्दल अधिक स्पष्टता येते. आज मी खूप स्पष्ट आहे किंवा असं म्हणायला हवं की गेल्या पाच ते सात वर्षांत काय करायचं नाही हे ठरवण्याच्या बाबतीत मी आता अधिक स्पष्ट झालोय. करिअरच्या सुरुवातीला काम मिळेल की नाही याबद्दल खूप अनिश्चितता असते. त्यामुळे तुमच्याकडे जे काही काम येतं, ते तुम्ही स्वीकारता.”
26 वर्षांच्या कारकिर्दीत अभिषेकने ‘गुरू’, ‘धूम’, ‘बंटी और बबली’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘ब्लफमास्टर’, ‘युवा’, ‘द बिग बुल’, ‘बॉब बिस्वास’, ‘टेन्थ’, ‘घुमर’, ‘आय वाँट टू टॉक’, ‘बी हॅपी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयाचं विशेष कौतुक झालं. अभिषेकला अनेकदा त्याच्या करिअरमुळे ट्रोलसुद्धा करण्यात येतं. अमिताभ बच्चन यांचा मुलगा असूनही इंडस्ट्रीत तेवढ्या ताकदीने आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात अभिषेक अपयशी ठरल्याचं अनेकांकडून म्हटलं जातं. एका पॉडकास्ट मुलाखतीत अभिषेकची बहीण श्वेता बच्चन हिने भावाच्या ट्रोलिंगविषयी राग व्यक्त केला होता. “माझं रक्त खवळतं”, अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली होती. अभिषेकची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाणं अजिबात पटत नसल्याचं तिने बोलून दाखवलं होतं.