Last Updated:
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंटचे अन्न सुरक्षा परवाने रद्द करण्यात आले आहेत.
मुंबई : राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम राबवणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सवर मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंटचे अन्न सुरक्षा परवाने रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत प्रसिद्ध रेस्टॉरंटचाही समावेश असल्याने या कारवाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत राज्यातील अनेक हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. अमरावतीतील 1 हॉटेलला बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे.
कोणत्या हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला?
भेंडी बाजारातील शालिमार हॉस्पिटॅलिटीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. सुधारणा नोटीस देऊनही पुनर्तपासणीत 25 गंभीर त्रुटी आढळल्या. तसेच भेंडी बाजारातील नूर मोहम्मदी हॉटेलचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. स्वयंपाकघरात अस्वच्छता, तेलाचे जाड थर, कीटकांचा मुक्त प्रवेश आढळला होता. कच्च्या मालाची अस्वच्छ साठवण, पुरवठादारांच्या नोंदींचा अभाव, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी नसल्याचे उघड झाले. उमरखाडीतील रहमानिया रेस्टॉरंटचाही परवाना रद्द
करण्याक आला आहे.
व्यवसाय बंद करण्याची नोटीस
अन्न साठवणुकीची अपुरी व्यवस्था, गंजलेली उपकरणे आणि निकृष्ट स्वच्छता, अन्नपदार्थ व पिण्याच्या पाण्याच्या आवश्यक चाचण्यांच्या नोंदी नसल्याचे यावेळी आढळले. अमरावतीतील अमरावती दरबार हॉटेलवरही FDA ने कारवाई केली आहे. वैध अन्न परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याने तात्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस दिली आहे.
तपासणी मोहीम सुरू
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी 18002223635 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
हे ही वाचा :
Mumbai,Maharashtra
शालिमार, नूर मोहोम्मद हॉटेलचे किचन पाहून अधिकारी हादरले, तुकाराम मुंढेंची भेंडीबाजारात मोठी कारवाई
