वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्य़े नापास! विराट-रोहितने विदेशात खेळलेल्या पहिल्या 3 सामन्यात काय केलं होतं? जाणून घ्याImage Credit source: Getty Images/ PTI
आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका गमावल्यानंतर भारताची इंग्लंडमध्येही तीच स्थिती आहे. भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका चौथ्या सामन्यानंतर 3-0 ने गमावली. या मालिकेत भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे निष्फळ ठरली. ज्या खेळाडूंवर विश्वास टाकला त्यांनीच घात केला असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार अपेक्षा होता. अवघ्या 15व्या वर्षी त्याच्या डोक्यावर अपेक्षांचा भार पडला होता. त्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा देण्यासाठी दबावही होता. पण वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत सर्व फासे उलटे पडले. वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून तीन सामने खेळले आहेत. पण तिन्ही सामन्यात त्याची बॅट काही चालली नाही. वैभव सूर्यवंशीने मँचेस्टरमध्ये 14, नॉटिंघमध्ये 13 आणि ब्रिस्टलमध्ये 15 धावा केल्या. त्याची खेळी पाहून आता टीकाकारांनी त्याच्या फलंदाजीच्या तंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दुसरीकडे, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडू विदेशातील पहिल्या तीन सामन्यात कशी कामगिरी केली होती? असा प्रश्नही विचारला जात आहे.
विराट कोहलीने विदेशातील पहिल्या तीन सामन्यात काय केलं?
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2008 मध्ये पदार्पण केलं. श्रीलंका दौऱ्यात वनडे मालिकेत खेळण्याची संधी त्याला मिळाली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात फक्त 10 धावा करू शकला. दुसऱ्या वनडे सामन्यात 37 धावांची खेळी केली, पण त्याचा स्ट्राईक रेट हा फक्त 55चा होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने 25 धावा केल्या. यातही त्याचा स्ट्राईक रेट हा 65चा होता. पण विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 85 शतकं ठोकली आहेत. पण पहिल्या तीन डावात फेल गेला होता.
रोहित शर्माचे पहिले तीन सामने कसे होते?
रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरूवात वनडे मालिकेपासून झाली. रोहित शर्माने पहिल्या वनडे सामन्यात फक्त 8 धावा केल्या होत्या. त्यानंतर डरबनमध्ये झालेल्या टी20 सामन्यात नाबाद 50 धावा केल्या. त्यानंतर पुन्हा 8 धावांवर बाद झाला. रोहित शर्माची सुरूवात फार काही ग्रेट झाली नाही. 2013 पर्यंत रोहित शर्मा टीम इंडियात जागा पक्की करण्यासाठी स्ट्रगल करत होता. पण ओपनिंगची संधी मिळाली आणि त्याच्या करिअरचा ग्राफ उंचावला.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची सुरूवात काही खास झाली नाही. पण आज त्यांचा नावलौकिक आहे. असंच काहीसं वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत होऊ शकतं. वैभव कार्यक्षम आहे. पण पहिल्या तीन सामन्यात फेल गेल्याने ट्रोल करण्याऐवजी त्याला जास्तीत जास्त संधी देण्याची गरज आहे.