मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून मुंबईत काही ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, मुंबईतील चेंबूर येथे एका स्कुलबसवर झाड कोसळून लहान शाळकरी (School) मुलाचा मृ्त्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लहानग्या विहान श्रीवास्तव यास आज मुंबई महापालिकेच्या (BMC) स्टँडिंग समितीच्या सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विहानच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. त्यावेळी, विहान आणि दुर्घटनेबद्दल बोलताना काही नगरसेवकांचा कंठ दाटून आला.
विहानच्या श्रद्धांजली प्रस्तावावेळी सभागृहातील वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. विविध पक्षांच्या अनेक नगरसेवकांनी विहानच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करताना अनेक नगरसेवकांना अश्रू अनावर झाले आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. चेंबूरमधील या दुर्घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली असून, स्टँडिंग समितीच्या सभागृहातून विहान श्रीवास्तव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, चेंबूर दुर्घटनेप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना सक्त रजेवर पाठवण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा
चेंबूर येथे बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सक्त रजेवर पाठवावे, अशी मागणी नगरसेवक, सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली. या प्रकरणाचा संपूर्ण चौकशी अहवाल समोर येईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना पदावर ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
अंधेरी पश्चिमेमध्ये गुलमोहराचे झाड कोसळले
चेंबूरमध्ये बसवर झाड कोसळल्याच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतील ही घटना घडल्याने मुंबईतील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी पावसाळ्यात अशा धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईत पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटना सुरूच असून, बुधवारी अंधेरी पश्चिम येथील आरटीओ कार्यालयाजवळ एक मोठे गुलमोहराचे झाड अचानक कोसळले. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहनांची रांग लागली. मात्र, सुदैवाने झाड कोसळत असताना त्याखाली कोणतेही वाहन किंवा पादचारी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले.
हेही वाचा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह