मुस्लीम असून आईच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का? संजय खान यांच्या मुलीने सोडलं मौन – Marathi News | Farah khan ali breaks silence on mother zarine khan hindu cremation despite being parsi marrying muslim


इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री झरीन खान यांचं नोव्हेंबर 2025 मध्ये निधन झालं होतं. झरीन यांचा जन्म पारसी कुटुंबात झाला होता आणि त्यांनी मुस्लीम संजय खान यांच्याशी लग्न केलं होतं. तरी त्यांच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अभिनेता जायेद खान आणि हृतिक रोशनची पूर्वी पत्नी सुझान खान ही त्यांची मुलं आहेत. झरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झालेल्या अंत्यसंस्कारानंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावर आता त्यांची मुलगी फराह अली खानने प्रतिक्रिया दिली आहे. आईने त्यांच्या निधनानंतर अस्थींचं विसर्जन पाण्यात केलं जावं, अशी इच्छा व्यक्त केली होती, असा खुलासा फराहने केला आहे.

आईच्या निधनाबद्दल बोलताना फराह यावेळी भावूक झाली. विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं, “आई त्या रात्री शांतपणे झोपली होती. ती इतकी शांत होती की, जेव्हा तिचं निधन झालं, तेव्हा ते वेदनादायी असूच शकलं नसतं. ती आम्हाला नेहमी सांगायची की, मी साईबाबांकडे प्रार्थना करते की जेव्हा माझं निधन होईल, तेव्हा झोपेतच एका क्षणात माझे प्राण निघून जावेत. जरी तिचा जन्म पारशी कुटुंबात झाला असला तरी तिने मुस्लीम कुटुंबात लग्न केलं होतं. तरीही तिने आम्हाला हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास सांगितलं होतं. कारण तिला तिच्या अस्थी काश्मीरमधील वाहत्या पाण्यात विसर्जित करायच्या होत्या.”

“आईला कबरीत गुदमरल्यासारखं वाटलं असतं. हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची तिची इच्छा असण्यामागे हे एक कारण होतं. मी अशा कुटुंबातून आले आहे, जिथे आम्हाला सर्व धर्मांवर प्रेम करायला आणि सर्व सण साजरे करायला शिकवलं गेलं. तिच्या अंत्यसंस्कारावरून अनेकांनी ट्रोल केलं होतं. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे. तुम्ही फक्त तुमच्या आवडत्या आणि महत्त्वाच्या लोकांकडेच लक्ष द्यायला हवं. आईच्या प्रार्थना सभेत पारसी, शीख, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम अशा वेगवेगळ्या धर्मांचे पाच धर्मगुरू होते. त्यांनी वेगवेगळ्या प्रार्थना म्हटल्या”, असं तिने पुढे सांगितलं.

याआधी फराहचा भाऊ जायेद खाननेही यावर प्रतिक्रिया दिली होती. “आपल्या आईची शेवटची इच्छा काहीही असो, ती पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. जग काय म्हणतं किंवा लोकांनी कितीही द्वेष पसरवला, तरी त्याने काही फरक पडत नाही. मी त्यांना दोष देत नाही. कारण सध्याची परिस्थितीच तशी आहे. दुर्दैवाने ती बदलायलाही वेळ लागेल. जेव्हा एखाद्याच्या शेवटच्या इच्छेचा प्रश्न येतो, तेव्हा धर्मापेक्षा माणुसकी आणि प्रेम अधिक महत्त्वाचं ठरतं. आमच्या घरात माणुसकी हाच सर्वांत मोठा धर्म आहे,” असं त्याने म्हटलं होतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *