भारतीय संघाचा पराभव होतोय हे पाहून आनंद झाला…पाकिस्तानी क्रिकेटपटू नको ते बरळला; विधानाची जोरदार चर्चा – Marathi News | Pakistani cricketer abid ali reacts to india t20i series defeat against ireland


भारत आणि आयर्लंडमध्ये रंगलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला. भारतीय संघ आयर्लंडसारख्या संघासमोर इतका हतबल दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सलग दोनवेळा विश्वचषक जिंकलेला संघाची ही अवस्था पाहून सर्वांनी टीका करायला सुरुवात केली. भारतीय माजी खेळाडूंनीही टीकास्त्र सुरु ठेवले. अनेक दिग्गज खेळाडूंनी आयर्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागची अनेक कारण सांगितली.  टीम इंडियाने या मालिकेत आयर्लंडकडून पहिल्यांदाच एक सामना गमावला आणि मालिकाही गमावली. आता पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनेही आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाने मालिका गमावल्यामुळे टीका केली आहे. त्याने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे.

आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर आबिद अलीने इन्स्टाग्रामवर लिहिले, “भारताला हरताना पाहून आनंद झाला.” आबिद अलीचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आबिद अलीने पाकिस्तानसाठी 16 कसोटी सामने खेळले असून, 49.16 च्या सरासरीने 1980 धावा केल्या आहेत. त्याने चार शतके आणि तीन अर्धशतकेही झळकावली आहेत. आबिद अलीने पाकिस्तानसाठी सहा एकदिवसीय सामने खेळले असून, एक शतक आणि एका अर्धशतकासह 234 धावा केल्या आहेत.

अबिद अलीने प्रोफेशन क्रिकेटमध्ये एकूण 37 शतके झळकावली. त्याने आपल्या प्रथम-श्रेणी कारकिर्दीत 11,696 धावा आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 3,874 धावा केल्या. मात्र, त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अवघ्या दोन वर्षांतच संपली. त्याने आपला शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला. पाकिस्ताननेही आयर्लंडकडून एक सामना गमावला असून, त्यांना 2024 मध्ये हा पराभव पत्करावा लागला होता.

आता भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ उद्यापासून इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका सुरु करणार आहे. यात पाच सामन्यांचा समावेश असणार आहे. यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका असणार आहे. आता आयर्लंडविरुद्ध इतके खराब प्रदर्शनानंतर इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करणं भारताला भाग आहे. अन्यथा टी-20 क्रिकेटमधील भारताचा दबदबा जो काही काळापासून आहे तो कमी होईल. भारतीय संघाकडे उत्कृष्ट टी-20 फलंदाज असूनही त्यांच्यावर अशी वेळ का आली हा विचार करण्याची गरज आहे आणि संघाला पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करण्याची गरज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *