Chandrashekhar Kulkarni Passes Away: मराठी पत्रकारितेच्या विश्वात आदराचं स्थान असणारे ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर उर्फ चंदू कुलकर्णी (Chandrashekhar Kulkarni) यांचे मंगळवारी निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. ते होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे संस्थापक शास्त्रज्ञ व विज्ञान लेखक प्रा. वि. गो. कुलकर्णी यांचे सुपुत्र होते. चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेतील एक बहुआयामी आणि प्रभावी लिखाण करणारे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारिता विश्वात शोकाकुल वातावरण आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या 1 जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Maharashtra news)
चंद्रशेखर उर्फ चंदू कुलकर्णी यांचा जन्म 3 मार्च 1965 झाला होता. त्यांनी सकाळ, लोकमत अशा प्रतिष्ठित दैनिकांचे संपादक म्हणून धुरा सांभाळली होती. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी 1985 साली पत्रकारितेला सुरुवात केली होती. त्यांनी नवशक्तीमधून आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला. 1986 साली ते दैनिक ‘सकाळ’मध्ये आणि त्यानंतर 1988 साली ते ‘महाराष्ट्र टाईम्स’ दैनिकात रुजू झाले. नव्वदीच्या दशकात त्यांनी वर्तमानपत्रात ‘चटकदार’ हे बहुदा पहिले लोकप्रिय हॉटेल संबंधातील सदर सुरू केले. हे सदर प्रचंड लोकप्रिय ठरले आणि दीर्घकाळ चालविले. त्यांनी 2017 साली जळगाव येथे पार पडलेल्या विज्ञान साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भुषविले होते.
याच काळात राज्यात खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांना त्याच काळात सुरुवात झाली. त्यातील भ्रष्टाचार, शैक्षणिक अधःपतन यांवरील शोध पत्रकारिता दर्शविणाऱ्या त्यांचे प्रभावी वृत्तांकन प्रचंड गाजले. याशिवाय, तुरुंगाच्या भिंतींआड खोटं रक्तदान करून शिक्षेत सूट मिळत असल्याच्या षड्यंत्राचा पुराव्यानिशी गौप्यस्फोट करणाऱ्या बातम्यांनंतर मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘यमुनाबाई खाडीलकर शोध पत्रकारिता पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला.
दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये दीर्घकाळ नोकरी केल्यानंतर ते सकाळ समूहात संपादक म्हणून रुजू झाले. आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात लोकमत समूहात संपादक मंडळावर होते. याशिवाय, शिक्षण व विज्ञान क्षेत्रातील रुचीमुळे विद्यालंकार शिक्षण संस्थेचे सल्लागार होते. त्यांनी एक धागा सूताचा ( कमला काकोडकर यांचे चरित्रलेखन), हर्षा भोगले यांच्या आऊट ऑफ बॉक्स पुस्तकाचा अनुवाद, द्रष्टा अणुयात्रिक (संपादन) आणि ते दोन क्षण सुद्धा (संपादन) आदी लेखन केले होते.
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?