बॉलिवूडमधील गाणी ही कायमच चर्चेत राहात. काही गाणी प्रदर्शित होऊन कित्येक वर्ष उलटली आहेत. तरी देखील आज अनेकजण ती गाणी तितक्याच आवडीने ऐकतात. पण बॉलिवूडमधील अशी पण काही गाणी आहेत ज्यांनी तेव्हा प्रचंड छाप सोडली होती. एक गाणे तर असे आहे जे प्रदर्शित झाल्यानंतर छत्र्यांची विक्री वाढली होती. आता हे गाणे कोणते जाणून घ्या..
साल १९५५ मध्ये राज कपूर यांचा ‘श्री ४२०’ सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. सिनेमामध्ये राज कपूर यांच्यासोबत नरगिस मुख्य भूमिकेत होत्या. सिनेमामधील गाणे ‘प्यार हुआ इकरार हुआ’ आजही लोकांच्या ओठांवर आहे.
हे गाणे ऐकायला जितके मधुर आहे, तितकेच ते पाहायलाही सुंदर आहे. विशेषतः पावसाळ्यात हे गाणे सर्वजण गुणगुणवतात. खरं तर, हे संपूर्ण गाणे पावसात शूट करण्यात आले आहे. त्यामुळे गाण्यात काम करणारे कलाकार आणि क्रू मेंबर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्याचे शूटिंग राज कपूर यांच्या आरके स्टुडिओमध्ये झाले होते. राज कपूर हे गाणे सिनेमामधून काढून टाकण्याच्या विचारात होते. त्यांना वाटले की, हे गाणे सिनेमाची गती मंद करेल. पण कंपोझर शंकर-जयकिशन आणि गीतकार शैलेंद्र यांनी हे गाणे सिनेमासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर गाणे पुन्हा सिनेमामध्ये समाविष्ट करण्यात आले. गाण्यात छत्रीखाली रोमान्स करणारा सीन एकाच शॉटमध्ये शूट करण्यात आला होता. ते त्या काळच्या सिनेमासाठी मोठी गोष्ट होती. यामुळे रिलीज होण्यापूर्वीच इंडस्ट्रीत या गाण्याची चर्चा सुरू झाली होती.
सिनेमा रिलीज झाल्यानंतर या गाण्यामुळे बाजारात छत्र्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. गाण्याच्या प्रभावामुळे छत्रीखाली रोमान्स करणे त्या काळी ट्रेंड बनला. या गाण्यातील काही सीन नंतर अनेक सिनेमामध्ये रीक्रिएट करण्यात आले. आजही सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स या गाण्यावर भरपूर रील्स बनवत आहेत आणि छत्रीवाला सीन रीक्रिएट करत आहेत.




