‘बांकरा मशीद’ हटवणार! विमानतळावरील मशिदीचे होणार स्थलांतर, लँडिंगमधील सर्वात मोठा अडथळा दूर | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

Bankra Mosque: कोलकाता विमानतळाच्या विस्तार आणि पुनर्विकास प्रकल्पासाठी धावपट्टीलगत असलेल्या बांकरा मशिदीचे स्थलांतर करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे.

News18
News18

कोलकाता: कोलकाता विमानतळ प्रशासनाने नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील बांकरा मशिदीचे स्थलांतर करण्याची योजना निश्चित केली आहे. विमानतळाच्या विस्तार आणि पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे विमानतळाची कार्यक्षमता वाढवणे आणि प्रवासी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवणे हा उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शनिवारी याबाबत माहिती देताना विक्रम सिंग यांनी सांगितले की 2013 पूर्वी कोलकाता विमानतळासाठी वापरल्या जाणाऱ्या जुन्या टर्मिनल इमारतीचे यंदाच्या हज यात्रेचे काम पूर्ण झाल्यानंतर पाडकाम करण्यात येणार आहे.

धावपट्टी सुरक्षेच्या निकषांमुळे मशिदीचे स्थलांतर

विमानतळाच्या दुय्यम धावपट्टीलगत असलेली बंक्रा मशीद सध्या विमानतळाच्या हद्दीत आहे. या मशिदीचे स्थलांतर झाल्यानंतर पुनर्विकासाचे काम अधिक वेगाने करता येईल तसेच अनेक वर्षांपासून असलेल्या कार्यात्मक अडचणी दूर होतील, असे विमानतळ प्रशासनाचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही मशीद दुय्यम धावपट्टीपासून सुमारे 165 मीटर अंतरावर आहे. मात्र आंतरराष्ट्रीय विमान सुरक्षा मानकांनुसार धावपट्टी आणि इमारती यांच्यात किमान 240 मीटर अंतर असणे आवश्यक आहे.

मशिदीचे धावपट्टीशी असलेले कमी अंतर हे विमानतळाच्या आधुनिकीकरणातील मोठे अडथळे मानले जात आहे. यामुळे प्रगत इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम (ILS) बसविणे शक्य झालेले नाही. परिणामी विमानतळाच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोठ्या विमानांच्या संचालनावर मर्यादा

विमानतळ प्रशासनाच्या मते सध्याच्या परिस्थितीमुळे दुय्यम धावपट्टीवरील टचडाउन पॉइंट कमी करावा लागतो. त्यामुळे मोठ्या आकाराची आंतरराष्ट्रीय वाइड-बॉडी विमाने या धावपट्टीवर पूर्ण क्षमतेने उतरवणे शक्य होत नाही. मशिदीचे स्थलांतर झाल्यानंतर या अडचणी दूर होतील आणि धावपट्टीशी संबंधित पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करता येईल. त्यामुळे विमानसेवा अधिक सुरळीत आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रवासी क्षमता 4 कोटींपर्यंत वाढणार

जुन्या टर्मिनल इमारतीचे पाडकाम आणि त्यानंतर होणाऱ्या पुनर्विकासामुळे विमानतळाच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. विमानतळ प्रशासनाच्या अंदाजानुसार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळची वार्षिक प्रवासी हाताळण्याची क्षमता सुमारे 4 कोटी (40 दशलक्ष) प्रवाशांपर्यंत पोहोचेल.

या विस्तार प्रकल्पामुळे विमानतळावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढवता येईल आणि कोलकात्याला पूर्व भारतातील अधिक सक्षम विमान वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्यास चालना मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या/देश/

‘बांकरा मशीद’ हटवणार! विमानतळावरील मशिदीचे होणार स्थलांतर, लँडिंगमधील सर्वात मोठा अडथळा दूर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *