राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अखेर शिवसेना ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदारांनी आज अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या बंडखोर खासदारांविरोधात ठाकरे गट न्यायालयात जाईल, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते अशा विविध शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. परंतु एकनाथ शिंदे यांनी या खासदारांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच मोठी खेळी केली आहे. त्यामुळे आता या सर्व खासदारांची खासदारकी सुरक्षीत झाली आहे. त्यामुळे या बाजुने देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीत, संसदीय चौकटीत ही प्रक्रिया आम्ही केलेली आहे. पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आधीच झाली आहे. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आधीच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असल्यामुळे आता या बंडखोर खासदारांवर संसदीय कारवायची शक्यता देखील मावळली आहे.
40 आमदार होते. आम्ही 60 आमदार निवडून आणले. चांदा ते बांद्यापर्यंत शिवसेना वाढवली. विचारधारा महत्त्वाची आहे. काही लोकांनी विचारधारा सोडली महाराष्ट्राने नाकारलं. महाराष्ट्र राज्य इतर राज्यांपेक्षा वेगळं आहे. पुरोगामी राज्य आहे. आपली संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे. लोकांच्या मनात जे आहे ते देण्याचं काम आम्ही केलं आहे. प्रचंड प्रमाणात लोक शिवसेनेत येत आहेत. विचारधारेशी जोडले जात आहे. आपला अजेंडा विकास आहे.
सहा खासदार सोबत आले आहेत. लाखो लोकांनी मतदान केल्याने ते निवडून आले आहेत. त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि जनता आणि सहा लोकांची ताकद आता वाढली आहे. त्या ठिकाणी शिवसेना अधिक बळकट होईल. त्यांच्या मतदारसंघातील विकास कामं, प्रश्न आणि प्रकल्प प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. मी दिलेला शब्द पाळतो हे माहीत आहे, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.