एकाच बेडवर झोपणे हे पती-पत्नीच्या मजबूत नात्याचे प्रतीक मानले जाते. मात्र आता परदेशात अनेक जोडपी या पारंपरिक विचारापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांमध्ये स्लीप डिव्होर्स म्हणजेच वेगवेगळ्या खोलीत किंवा स्वतंत्र बेडवर झोपण्याचा ट्रेंड वाढला आहे. अनेकांना हे वाचून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल असं वाटत असेल, मात्र प्रत्यक्षात चित्र याच्या अगदी उलट आहे. अनेकांच्या मते, यामुळे केवळ चांगली झोपच मिळत नाही, तर नात्यातील प्रेम, समजूतदारपणा आणि संवादही अधिक मजबूत होतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नवरा बायको वेगवेगळे का झोपत आहेत?
नवरा बायको एकत्र झोपतात तेव्हा काही जोडप्यांना त्रासाचा सामना करावा लागतो. जोडीदाराचे मोठ्याने घोरणे, रात्री वारंवार कुशी बदलणे, झोपण्याची किंवा उठण्याची वेगवेगळी वेळ, मोबाईलचा वापर यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या झोपेवर परिणाम होतो. अनेक दिवस पुरेशी झोप न झाल्यास याचा परिणाम मूड, मानसिक आरोग्य आणि नातेसंबंधांवरही होतो. याच कारणामुळे अनेकजण रात्री स्वतंत्र खोलीत किंवा वेगळ्या बेडवर झोपण्याचा पर्याय निवडत आहेत. यामुळे दोघांनाही आपल्या सोयीनुसार शांत झोप घेता येते आणि सकाळी फ्रेश वाटते. तज्ज्ञांच्या मते, पुरेशी आणि दर्जेदार झोप व्यक्तीला शांत, संयमी आणि भावनिकदृष्ट्या संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यामुळेच जोडपी हा पर्याय निवडत आहेत.
हा ट्रेंड कोण स्वीकारत आहे?
वेगवेगळे झोपण्याची ही पद्धत केवळ वयोवृद्ध जोडपी नव्हे तर तरुण जोडपीही स्वीकारत आहेत. काहींचे ऑफिस उशिरापर्यंत सुरू असते, तर काहींना सकाळी लवकर उठावे लागते. त्यामुळे दोघांच्या दिनचर्येत फरक असल्याने एकमेकांच्या झोपेवर परिणाम होतो. तसेच लहान मुलं असलेल्या कुटुंबांमध्येही आई-वडील मुलाची आळीपाळीने काळजी घेण्यासाठी स्वतंत्र झोपण्याचा निर्णय घेतात, यामुळे दोघांनाही चांगला आराम मिळतो.
वेग वेगळं झोपण्याचा नात्यावर परिणाम होतो का?
महत्त्वाची बाब म्हणजे वेगवेगळे झोपणे म्हणजे नात्यातील प्रेम कमी झाले, असं नाही. रिलेशनशिप तज्ज्ञांच्या मते, मजबूत नाते हे फक्त एकाच बेडवर झोपल्याने तयार होत नाही, तर एकत्र घालवलेला वेळ, संवाद, परस्पर विश्वास आणि भावनिक नात्यावर ते अवलंबून असते. अनेक जोडपी झोपण्यापूर्वी एकत्र वेळ घालवतात, गप्पा मारतात आणि त्यानंतर चांगल्या झोपेसाठी आपापल्या खोलीत जातात.
जर एखाद्या व्यक्तीची झोप अपुरी राहिल्यास काही काळानंतर चिडचिड वाढू शकते आणि छोट्या-छोट्या कारणांवरून वाद वाढू शकतात. मात्र पुरेशी झोप मिळाल्यास तणाव कमी होतो आणि नात्यात संयम, सकारात्मकता आणि समजूतदारपणा टिकून राहतो. त्यामुळे परदेशातील अनेक जोडपी ही पद्धत नाते तुटू नये म्हणून नव्हे, तर ते अधिक मजबूत आणि आनंदी बनवण्यासाठी स्वीकारत असल्याची माहिती समोर आली आहे.