Jaykumar Gore : भाजपचे अनेक नेते कार्यकर्ते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करुन सत्ता आणली आहे, त्यामुळं इच्छा असणे गैर नसल्याचे वक्तव्य पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आमदार होण्याची संधी आहे. त्यामुळे अपेक्षा असणे साहजिक आहे. मोहिते पाटलांसंदर्भात बोलताना गोरे म्हणाले की, विरोधकांनी कितीही मोट बांधली तरी 100 पेक्षा अधिक मतं त्यांना मिळणार नाहीत. काल सोलापूर जिल्ह्यातील आकडेवारी काढली काँग्रेसकडे केवळ 5 आणि एमआयएम कडे 9 मतदान आहे. त्यामुळे कितीही मोठी मोट बांधली तरी काही होणार नाही असे गोरे म्हणाले. .
निवडणूक बिनविरोध करावी अशी अनेकांची भावना
माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की निवडणुका झाल्यात त्यावेळी काय परिस्थिती होती आपण पाहिले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी मी चर्चा करायला तयार असल्याचे गोरे म्हणाले. निवडणूक ही केवळ औपचारिकता राहिली आहे. जिल्ह्यात नवीन इतिहास करण्यासाठी निवडणूक बिनविरोध करावी अशी अनेकांची भावना आहे.
पेट्रोल डिझेलचा साठा कुठेही कमी नाही
पेट्रोल डिझेलचा साठा कुठेही कमी नाही. नागरिकांच्या मनात भिती तयार करण्यासाठी एक टोळी तयार झाली आहे. लोकांच्या मनात भिती निर्माण झाल्याने पेट्रोल डिझेलचा स्टॉक केला जात आहे. अधिकची खरेदी होत असल्याने अशी परिस्थिती निर्माण होतेय. मात्र प्रत्यक्षात कुठेही तुटवडा नाही असे गोरे म्हणाले.
कॉकरोज जनता पार्टी संदर्भात मला माहिती नाही
कॉकरोज जनता पार्टी संदर्भात मला या संदर्भात अधिकची माहिती नाही. असे अनेक ट्रेंड समाजात होताना आपण बघतो. सध्या AI चा जमाना आहे त्यामुळे अशा गोष्टी होत राहतात. त्यामुळे त्याला अधिकचं महत्त्व देण्याची गरज नाही. विरोधी पक्षाला अनेक क्लुप्त्या लढवताना आपण पाहिले आहे. विरोधकांना जनमाणसात स्थान नाही, प्रतिमा नाही, लोक आपल्या पाठीमागे येत नाहीत. त्यामुळे नवीन योजना आखून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करणे. देशाचे नेतृत्व भक्कम आहे, एक मजबूत भारत आपण जगासमोर उभारला आहे. त्याप्रमाणे विकसित महाराष्ट्राचा स्वप्न घेऊन देवेंद्र फडणवीस काम करत आहेत असे गोरे म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत
जरांगे पाटील आंदोलनाबाबत विचारले असता गोरे म्हणाले की, या प्रश्नावर उत्तर देण्याची जबाबदारी प्रवक्त्यांची आहे. पण मी एवढे सांगेन की, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. कुणबी दाखल्याचा प्रश्न मार्गी लागला. आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणबी दाखल्यावर अनेकांनी निवडणूक लढवल्या. अनेक ठिकाणी नोकरीसाठी देखील दाखल्याचा वापर होतो. अण्णासाहेब पाटील महामंडळ सारथी या सर्वच संस्थांना सरकार मदत करतंय. लोकशाहीत सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र समाज व्यवस्था बाधित होईल अशा पद्धतीचा आंदोलन किंवा मत व्यक्त करणे चुकीचं होईल. समाजात समाजात तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. लढा लढण्याचा अधिकार सर्वांना आहे पण त्याचे परिणाम आपण सर्वांनी पाहिल्याचे गोरे म्हणाले.
आणखी वाचा