गौतम गंभीरने नाटकं बंद करावी, राहुल द्रविडच्या काळात तर…! आर अश्विनने व्यक्त केला संताप – Marathi News | R Ashwin expressed his anger while highlighting the difference between Dravid and Gambhir coaching styles


गौतम गंभीरने नाटकं बंद करावी, राहुल द्रविडच्या काळात तर…! आर अश्विनने व्यक्त केला संतापImage Credit source: PTI

बीसीसीआय गेल्या काही वर्षात आयसीसी स्पर्धेच्या तयारीसाठी रणनिती आखण्यावर जोर देत आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला अजून वर्षभराचा अवधी आहे. मात्र त्यासाठी संघाची बांधणी आतापासूनच केली जात आहे. तसेच वनडे मालिकांवर जोर दिला जात आहे. असं असताना इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका काही खास गेली नाही. या मालिकेतील पहिला सामना जिंकूनही मालिका गमवण्याची वेळ आली. त्यामुळे भारतीय संघाच्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या तयारीची हवा निघून गेली आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या सारखे दिग्गज खेळाडू संघात असताना पराभव झाल्याने क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. या पराभवानंतर आर अश्विननेही संताप व्यक्त केला आहे. इतकंच काय तर गौतम गंभीरच्या प्रशिक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच राहुल द्रविडच्या कोचिंगचा दाखला देत कानपिचक्याही दिल्या आहेत.

आर अश्विनने असा व्यक्त केला संताप

आर अश्विनने राहुल द्रविडच्या कोचिंग कालावधीचा उल्लेख करत गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे. आर अश्विन म्हणाला की, ‘हार्दिक पांड्या संघात नाही तर तुम्ही वारंवार त्याच खेळाडूंच रडगाणं गाता जे फिट नाहीत. 2023 वनडे वर्ल्डकप लक्षात ठेवा, हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर द्रविडने संघात कोणतीही भीती पसरू दिली नाही. नाइलाजास्तव सहावा तात्पुरता गोलंदाज मैदानात उतरण्याऐवजी पाच अनुभवी गोलंदाजांना मैदानात उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला. या रणनितीने संघाने अंतिम फेरी गाठली. सध्याचे प्रशिक्षक अर्धवट तयार असलेल्या अष्टपैलू खेळाडूंना खेळवण्याच्या ध्यासाने पछाडलेले आहे. या मूर्खपणामुळे आपण कसोटीतही पराभूत होत आहोत.’

… तर पर्याय वापरणं बंद करा

भारतीय संघाची वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी तयारी सुरू आहे. या स्पर्धेपूर्वी आर अश्विनने एक सल्ला दिला आहे. आर अश्विन म्हणाला की, भारताला खरंच वनडे वर्ल्डकप 2027 जिंकायचा असेल तर रोजचे प्रयोग थांबवायला हवेत. गंभीर आणि निवड समितीने आता नाटकं बंद करावीत. तसेच दोन यष्टीरक्षक, तीन फिरकी गोलंदाज आणि पाच वेगवान गोलंदाज असलेल्या 17-18 खेळाडूंचा एक भक्कम चमू तयार करावा. हे खेळाडू पुढच्या 14 महिन्यात खेळतील असं सांगावं. या गटातील खेळाडूंना आलटून पालटून संधी द्या. त्यामुळे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात सर्वोत्तम प्लेइंग 11 घेऊन उतरता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *