Last Updated:
Railway Rule: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता प्रवासात केलेल्या चुका महागात पडू शकतात. आर्थिक दंडासोबत थेट तुरुंगवासही होऊ शकतो.
कोल्हापूर: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने ‘जन विश्वास कायदा 2026’ लागू केला असून रेल्वे कायद्यात कडक बदल केले आहेत. त्यामुळे आता रेल्वेतून विनातिकीट प्रवास केल्यास चांगलीच अद्दल घडणार आहे. नव्या नियमानुसार किमान दंडाची दुप्पट तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणाऱ्यांना थेट तुरुंगाची वारी घडणार आहे.
रेल्वेचा महसूल वाढवण्यासोबत प्रवाशांना शिस्त लावण्यासाठी रेल्वेने नियमांत बदल केले आहेत. याच नव्या नियमांच्या अंमलबजावणीमुळे एप्रिल ते जून 2026 या काळात तिकीट तपासणी पथकाने पुणे विभागात तब्बल 11 कोटी 10 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर गेल्या वर्षभरात एकूण 30 कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल झाला होता.
रेल्वेत आता विनातिकीट प्रवास करणं चांगलंच महागात पडणार आहे. पूर्वी विनातिकीट प्रवास केल्यास किमान दंड 250 रुपये होता. आता नव्या नियमानुसार तो दुप्पट करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना विनातिकीट प्रवासाचे 500 रुपये आणि प्रवास केलेल्या अंतराचे भाडे स्वतंत्रपणे भरावे लागेल. या नियमाची देशभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्म आणि डब्यात भीक मागून प्रवाशांना त्रास दिल्याच्या घटना वारंवार घडतात. आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय वस्तूंची विक्री करणे, भीक मागणे महागात पडणार आहे. यासाठी दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. तसेच महिलांच्या डब्यात प्रवेश करणाऱ्या पुरुषांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
विनातिकीट प्रवासाशिवाय इतर बाबतीत देखील रेल्वे प्रवास करताना काळजी घ्यावी लागेल. अतिरिक्त सामानासह प्रवास केल्यास जास्त दंड आकारण्यात येईल. उगीच साखळी ओढल्यास देखील मोठा दंड आणि कैदेची तरतूद करण्यात आली आहे. तर डब्यात धूम्रपान करणं किंवा गुटखा खाणं महागात पडणार असून तात्काळ दंड आकारण्यात येईल.
दरम्यान, नवीन कायदा हा प्रवाशांमध्ये शिस्त आणण्यासाठी आहे. प्रवाशांकडून दंड घेणे हा त्याचा उद्देश नाही. प्रत्येकाने वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. तसेच वारंवार नियम मोडणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. प्रवाशांसोबत गैरवर्तन, शिवीगाळ मारहाण केल्यास न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. अशा घटनांत अगदी तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.
Kolhapur,Maharashtra
Jul 05, 2026 12:01 PM IST
