IND vs IRE 2nd T20 : वय फक्त 15, पण… आयर्लंडच्या गोटात वैभवच्या नावाची धास्ती! पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा जय अचानक असं का बोलला? Video व्हायरल


Jai Moondra on Vaibhav Sooryavanshi : भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम सामन्यापूर्वी एक अतिशय रंजक वक्तव्य समोर आले आहे, ज्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडसाठी शानदार पदार्पण करणाऱ्या भारतीय वंशाचा वेगवान गोलंदाज जय मुंद्रा याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो भारताचा 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचे भरभरून कौतुक करताना दिसत आहे. वैभवच्या नावाचा दबदबा आणि धास्ती आयर्लंडच्या गोटात स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

पहिल्या सामन्याचा हिरो जय मुंद्रा काय म्हणाला?

आयर्लंडसाठी आपल्या पहिल्याच सामन्यात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या जय मुंद्राने अधिकृत ब्रॉडकास्टर ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’शी बोलताना वैभव सूर्यवंशीच्या प्रतिभेचे कौतुक केले. तो म्हणाला की, “वय हा केवळ एक आकडा आहे. तो भारतासाठी खेळत आहे आणि त्याला लवकरच आंतरराष्ट्रीय कॅप देखील मिळू शकते. आपल्या सर्वांना माहीत आहे की त्याच्यामध्ये किती क्षमता आहे आणि त्याने स्वतःला सिद्धही केले आहे. वयाचा विचार बाजूला ठेवा, तो मैदानावर कधीही मोठा धमाका करू शकतो. सध्या तो संपूर्ण जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेत आहे आणि तो किती उच्च दर्जाचा खेळाडू आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. प्रत्येकाला तो आवडतो आणि येथे आयर्लंडमधील लोकांनाही त्याला खेळताना पाहायचे आहे.”

दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का?

मालिकेतील पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल अशी क्रिकेट चाहत्यांना आशा होती, परंतु त्याला संघात स्थान मिळाले नाही. आता पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघावर मालिका वाचवण्याचे मोठे दडपण आहे. हा सामना भारतासाठी ‘करो या मरो’ असा झाला आहे. अशा परिस्थितीत कर्णधार श्रेयस अय्यर दुसऱ्या सामन्यात या युवा फलंदाजाला पदार्पणाची संधी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. जर वैभवला संधी मिळाली, तर त्याला रोखणे आयर्लंडच्या गोलंदाजांसाठी मोठे आव्हान असेल.

पहिल्याच चेंडूवर विकेट घेत जय मुंद्राने रचला इतिहास

भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडकडून पदार्पण करणाऱ्या जय मुंद्राने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने आपल्या कोट्यातील 4 षटकांत अवघ्या 25 धावा देऊन 2 महत्त्वाचे बळी घेतले. विशेष म्हणजे, त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच आयर्लंडचा संघ भारताविरुद्ध पहिला ऐतिहासिक विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता.

हे ही वाचा –

India tour of Sri Lanka : BCCIचा मोठा निर्णय! फक्त कसोटी होणार, टी-20 ला नो एन्ट्री… ‘या’ देशाच्या क्रिकेट बोर्डाचा प्रस्ताव थेट कचऱ्याच्या डब्यात, नेमकं काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *