Last Updated:
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 76 रनवर ऑलआऊट झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर चांगलाच संतापला आहे.
नॉटिंघम : आधी आयर्लंडनंतर आता इंग्लंडविरुद्धही वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची हाराकिरी सुरूच आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा फक्त 76 रनवर ऑलआऊट झाला आहे. इंग्लंडने दिलेल्या 202 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला फक्त 11.4 ओव्हरपर्यंतच बॅटिंग करता आली आणि इंग्लंडने हा सामना 125 रननी जिंकला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला टीम इंडियाचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे.
भारताकडून कोणत्याच खेळाडूला 20 रनचा टप्पाही पार करता आला नाही. वैभव सूर्यवंशी आणि इशान किशन यांनी 13-13 रन केले तर अभिषेक शर्माने 10 आणि अक्षर पटेलने 10 रनची खेळी केली. इंग्लंडकडून जॉश टंगला 4, जोफ्रा आर्चरला 3 विकेट मिळाल्या. याशिवाय आदिल रशीदने 2 आणि विल जॅक्सने 1 विकेट घेतली.
श्रेयस अय्यर भडकला
इंग्लंडविरुद्धच्या या हाराकिरीनंतर टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर चांगलाच संतापला आहे. ‘एवढ्या मोठ्या फरकाने झालेला पराभव स्वीकारू शकत नाही, हे सहन करू शकत नाही. आमचा पराभव झाला हे आम्हाला मान्य करावं लागेल आणि पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये जावं लागेल. ही खेळपट्टी 200 रनची नव्हती. पॉवरप्लेमध्येच आम्ही 4 विकेट गमावल्या, त्यामुळे आम्ही मागे ढकललो गेलो’, असं श्रेयस अय्यर म्हणाला.
‘तुम्ही बऱ्याच गोष्टी प्लान करू शकता, पण जेव्हा तुम्ही मैदानात जाता तेव्हा तुम्हाला त्याची अमंलबजावणी करावी लागते. कोणती लेन्थ योग्य आहे, हे तुम्हाला पाहावं लागतं. हार्ड लेन्थवर बॉलिंग केल्यानंतर रन काढणं कठीण जात होतं, पण आम्ही हार्ड लेन्थवर बॉलिंगच केली नाही. आम्हाला जोरदार पुनरागमन करावं लागेल, इतिहासात काय झालं हे खोदून काढण्यात अर्थ नाही. प्रत्येक खेळाडूला तो टीमसाठी कसं योगदान देऊ शकतो, याचा विचार करावा लागेल’, असं म्हणत श्रेयस अय्यरने टीममधल्या खेळाडूंचे कान टोचले आहेत.
श्रेयसच्या नेतृत्वात पहिल्या विजयाची प्रतिक्षा
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला तरीही बीसीसीआय आणि निवड समितीने सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सीवरून हटवून श्रेयस अय्यरला टी-20 टीमचं नेतृत्व दिलं, पण त्यानंतर टीम इंडियाचा एकही विजय झालेला नाही. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने गुडघे टेकले, त्यामुळे 5 सामन्यांनंतरही श्रेयस अय्यर अजून त्याच्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.
Mumbai,Maharashtra
