नवी दिल्ली : आयसीसीनं टी 20 वर्ल्ड कप 2028 आणि वन डे वर्ल्ड कप 2027 च्या फॉरमॅटमध्ये बदल केले आहेत. वनडे वर्ल्ड कपमध्ये सुपर सिरीज, राऊंड 2, राऊंड 3 सुपर-7 आणि सेमी फायनल, फायनल असे बदल करण्यात आले आहेत. तर,टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 10, एलिमिनेटर आणि सेमी फायनल आणि फायनल असा फॉरमॅट असेल. आयसीसीकडून करण्यात आलेल्या बदलांमुळं क्रिकेट चाहत्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमधील एक संभाव्य समीकरण शोधून काढलं आहे. त्यानुसार वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने येऊ शकतात.
भारत पाकिस्तान तीनवेळा आमने सामने?
भारत आणि पाकिस्तान 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये एकदाच सामने आमने सामने आले होते. पाकिस्तान उपांत्य फेरीत न पोहोचल्यानं दुसरा सामना होऊ शकला नव्हता. आयसीसीनं एडिनबर्गच्या वार्षिक बैठकीत केलेल्या बदलानंतर क्रिकेट चाहते संभाव्य समीकरण लक्षात घेत दावा करत आहेत.
भारत आणि पाकिस्तान दुसऱ्या राऊंडमध्ये आमने सामने येऊ शकतात. यानंतर तिसऱ्या फेरीत राऊंड रॉबिन फॉरमॅट असल्यानं तिथं दोन्ही संघ आमने सामने येऊ शकतात. यानंतर दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचल्यास कदाचित उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत आमने सामे येऊ शकतात. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आले होते, ती स्पर्धा भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरली होती. त्याच प्रकारे वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आल्यास क्रिकेट चाहत्यांसाठी ती मोठी पर्वणी ठरु शकते.
आयसीसीकडून वनडे वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलण्यात आल्यानंतर काही नेटकऱ्यांकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने वाढवण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचा दावा केला जातोय.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) July 15, 2026
पुढील वनडे वर्ल्ड कपमध्ये 14 टीम सहभागी होतील. 12 व्या, 13 व्या आणि 14 व्या क्रमांकावरील तीन संघांमध्ये सुपर सिरीज खेळवली जाईल. यामध्ये विजयी होणारा एक संघ राऊंड 2 मध्ये पोहोचेल. पहिल्या फेरीतच दोन संघ बाहेर पडतील. त्यानंतर राहिलेल्या 12 संघांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल. दोन्ही ग्रुपमधील पहिले तीन संघ आणि राहिलेल्या संघातील चांगली कामगिरी करणारा एक संघ यांचा मिळून सुपर-7 राऊंड केला जाईल. सुपर-7 मधील राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये 21 सामने खेळवले जातील. यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या आणि चौथ्या स्थानावरील संघात उपांत्य फेरीचा एक सामना होईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांमध्ये उपांत्य फेरीचा एक सामना होईल.