Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला


Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंक वरून आलो हेच सगळ्यांना उत्तर असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. पुण्यातील नाना पेठेतील निवडुंग विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम पालखीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ हे आधीच पालखीच्या ठिकाणी उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि विश्वजित कदम एकत्रितपणे दर्शनासाठी पोहोचले.

सगळ्यांनी सुखरूप जावं हेच आवाहन

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी देवाकडे येताना काही मागत नाही. न मागता सुद्धा मिळतं. या वारीमध्ये येण्याची एक अनुभूती आहे. ती आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. ते म्हणाले की, सगळ्या वारकऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही सगळे आनंदाने जा आणि सुखरुप जा. वारकरी हे शेतकरी पण आहेत त्यामुळे त्यांच चांगल होवू दे. यंदा वारीसाठी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या ठिकाणी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली आहे. सगळ्यांनी सुखरूप जावं हेच आवाहन असल्याचे ते म्हणाले. 

महाराष्ट्र द्रोहीच आहेत, राज्याचे दुश्मन आहेत

दुसरीकडे, एकनाथ शिंदे आज (10 जुलै) विधान परिषदेत बोलताना म्हणाले की, मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही, विदेशातून लोक येत आहेत. महाराष्ट्राचे शत्रूही करत नसतील एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपल्या विरोधी पक्षातील सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील ते करत आहेत. खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करत आहेत, त्यांना आपण काय म्हणणार? आता इथं महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्र द्रोहीच आहेत. हे राज्याचे दुश्मन आहेत. कुठलाही प्रकल्प बदनाम झाला, तर ती महाराष्ट्राची बदनामी होते, कुठल्या पदाधिकाऱ्याची, मुख्यमंत्र्याची नाही, मंत्र्यांची नाही, त्यामुळे शेवटी तारतम्य बाळगलं पाहिजे. 

मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल (Engineering Marvel) आहे. मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही, वाहतूक सुरू झाली. काही लोकांनी जे काही आकाश पाताळ एक केलं की मिसिंग लिंक पडला. अरे मिसिंग लिंक पडला का त्याची कमान पडली? किमान याची तरी तपासणी करून माहिती घेऊन तर बोलायला पाहिजे होतं. या प्रकल्पाची किंमत 6,695 कोटी रुपये, प्रत्यक्ष खर्च 7,189 कोटी रुपये, वाढ फक्त 7.26 टक्के झाली. मंजूर रकमेच्या 10 टक्क्यांपेक्षा देखील कमी, ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पामुळे मुंबईपुणे 40 मिनिटांनी अंतर कमी झालं. पुढचं सातारा, तुमचं कोल्हापूर सगळंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा गेम चेंजर प्रकल्प आहे. दर दिवशी एक कोटी रुपयांचं इंधन वाचतंय, प्रदूषण वाचतंय, वाहतूक कोंडी वाचते आहे असे शिंदे यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *