रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा ‘दे धक्का’, म्हणाले काही…


मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते तथा विधानपरिषद आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापती पदासाठी आपला अर्ज दाखल केला. त्यामुळे, हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात असून या राजकीय घडामोडीवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, आम्ही रात्री सोबत होतो, गप्पा मारल्या, पण मला सकाळी त्यांचा मेसेज आला, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी दिली.  

मला सकाळी 11.30 वाजता सचिन अहिर यांनी इंग्रजीत मॅसेज केला, मला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मी काही निर्णय घेतोय असं ते मॅसेजमध्ये म्हणाले. काल रात्रीपर्यंत आम्ही सोबत होतो, सोबतच इथून गेलो, त्यांनी असा निर्णय का घेतला हे बघावं लागेल, असे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले. वरळी ही शिवसेनेचीच आहे, सुनिल शिंदे यांनी सचिन अहिर यांना पराभूत करुनच ते आमदार झाले होते, अशात, ते जाण्याचे काही फरक पडणार नाही. आम्ही उपसभापती पदासाठी अर्ज भरला आहे, अभ्यंकर सरांचा अर्ज आम्ही भरला आहे, अशी माहिती अंबादास दानवे यांनी म्हटलं. 

आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मी गेले 4 दिवस पाहातोय, जवळच्या लोकांना सगळं मिळतंय. वरळी शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. कोणी येण्याने जाण्याने पक्षाला धक्का बसत नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर दिली. आदित्य ठाकरे बोलूच नाही शकत असं आता हे म्हणून शकत नाहीत. अजून काय पाहिजे तुम्हाला, प्रभाग समिती, बेस्ट, शिवसेनेत उपनेतेपद आहे, युनियन अध्यक्ष एवढं सगळं दिलंय. अजून काय पाहिजे? हा प्रश्न आहे, आता आरत्याच करायच्या का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.  

संविधान बदलणाऱ्यांसोबत कसं बसू शकता?

भेटत नव्हतो का? तर असं पण नाही आहे, कारण मी त्यांच्यासोबतच असायचो. मनात नैराश्य होतंच, पुढे काय होणार? संविधान बदलणार का? खासदार गेलेत, आज हे गेलेत, आपली मंदिरं लुटत आहेत. हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कसे बसू शकता? संविधान बदलणाऱ्यांसोबत कसे बसू शकता? असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.  

2 वर्षासाठी सचिन अहिर यांच्याकडे पद

सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना आज सकाळी संपर्क साधून पक्ष सोडणार संदर्भातील भूमिका मांडली होती. सचिन अहिर यांनी भारतीय कामगार सेना आणि बेस्ट कर्मचारी सेनेच्या पदावरुनही राजीनामा दिला आहे. गेल्या 3 दिवसांपासून सचिन हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते, वैयक्तिक कारणास्तव ही राजकीय भूमिका घेतली, असे मत सचिन अहिर यांनी मांडले. दरम्यान, पुढील 2 वर्षाकरिता उपसभापतीपद हे सचिन अहिर यांच्याकडे असणार आहे.

आम्ही उमेदवारी अर्ज भरणार होतो, पण…

मला सकाळी अनिल परब यांचा उपसभापती निवडणुकीबाबत फोन आला होता, उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी आम्ही शिवसेना म्हणून फॉर्म भरतोय असं बोलणं झालं होतं. महाविकास आघाडीकडे बहुमत नाही, मात्र आमची काल प्राथमिक चर्चा झाली होती. आपण उमेदवारी अर्ज भरू सरकारने विनंती केली तर माघार घेऊ, पण लोकशाहीमध्ये निवडणूक लढवूया असं ठरलं होतं. मात्र, फॉर्म भरेपर्यंतच आम्हाला दुसरी बातमी कळाली, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते तथा आमदार सजेत पाटील यांनी दिली. दुसऱ्या बाजूने सचिनभाऊ अहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज भरल्याचं दिसलं, सचिनभाऊ तांत्रिकदृष्ट्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले होते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते उद्धव ठाकरेंच्या सोबत होते, पण आज तेच उपसभापतीपदाचे उमेदवार झाल्याची बातमी कळाली, अशी माहितीही सतेज पाटील यांनी दिली. 

आता, सचिन अहिर पैसे घेऊन तिकडे गेले का?

मातोश्रीला सुरुंग  लावायचा प्रश्नच येत नाही, काही तिथे राहिलंच नाही. आता म्हणणार का, सचिन अहिर यांनी पैसे घेऊन तिकडे गेले. आदित्य ठाकरे हे सचिन अहिर यांच्यामुळेच आमदार आहेत, त्यामुळे 2029 चा ही प्रश्न येत नाही. आता, ⁠सचिन अहिर सांगतील सर्व काही, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.  

हेही वाचा

उद्धव ठाकरे नी*, मौलवींसोबत शय्या, 2019 मध्ये शेण खाल्लं, आता लग्नात फोटोग्राफी करावी : नितेश राणे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *