गौरव खन्नाचा लग्नाच्या 10 वर्षांनंतर घटस्फोट; पत्नी म्हणाली “गेल्या वर्षभरापासून आम्ही..” – Marathi News | Gaurav Khanna wife Akanksha Chamola confirms divorce in lock upp season 2 bigg boss 19 winner


गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोलाImage Credit source: Instagram

‘बिग बॉस 19’चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गौरवची पत्नी आणि अभिनेत्री आकांक्षा चमोलाने ‘लॉक अप 2’ या रिअॅलिटी शोमध्ये त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. गौरवशी घटस्फोट घेणार असून गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगवेगळे राहत असल्याची जाहीर कबुली तिने दिली आहे. हे ऐकून सूत्रसंचालक फराह खान आणि रितेश देशमुखसह इतर सर्वांना मोठा धक्का बसतो. आकांक्षाने घटस्फोटाबद्दल सांगताना असंही स्पष्ट केलं की तिच्या आणि गौरवच्या नात्यात कोणतीच कटुता नाही आणि सर्वकाही ठीक आहे. गौरव आणि आकांक्षा ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक असल्याने त्यांच्या घटस्फोटाचं वृत्त ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

‘लॉक अप’ या शोचा दुसरा सिझन नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला आहे. यामध्ये गौरवची पत्नी आकांक्षानेही भाग घेतला आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये तिने घटस्फोटासारखी मोठी बातमी सर्वांसमोर जाहीर केली. या शोच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये आकांक्षा म्हणाली, “तर मी आणि गौरव घटस्फोट घेत आहोत. गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत. आम्ही ही गोष्ट सार्वजनिक केली नव्हती, मात्र हे माझं सीक्रेट आहे.” यापुढे बोलताना आकांक्षाने स्पष्ट केलं की दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतला असून त्यांच्यात अजिबात कटुता नाही.

आकांक्षाचा खुलासा-

“हा आम्हा दोघांचा निर्णय गोता. आम्ही गेल्या वर्षभरापासून याबद्दल विचार करत होतो. माझ्यात आणि गौरवमध्ये कसलाच वाद किंवा कोणतीच कटुता नाही. आम्ही आताही एकमेकांशी बोलतोय. मात्र पार्टनर किंवा जोडीदार म्हणून आम्ही एकमेकांसाठी चांगले आहोत, असं आम्हाला वाटत नाही. कारण भविष्याकडे पाहण्याचा आम्हा दोघांचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे. दुर्दैवाने ते भविष्य आमच्यासोबत नाही. त्यामुळे आमच्यात काही मतभेद नाहीत”, असं तिने सांगितलं. हे ऐकल्यानंतर रितेशने तिला विचारलं की, जेव्हा गौरव ‘बिग बॉस’मध्ये होता, तेव्हापासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता का? त्यावर आकांक्षाने होकारार्थी उत्तर दिलं.

“सुरुवातीला आमच्या दोन्ही कुटुंबीयांनाही हेच वाटलं होतं की आम्ही काही काळासाठी फक्त वेगळे राहत आहोत. कारण कधीकधी काही गोष्टी सोडवण्यासाठी दोन जणांमध्ये काही अंतर ठेवणं गरजेचं असतं. मात्र आम्ही एकमेकांशी बोलत होतो, कार्यक्रमांमध्ये एकत्र जात होतो, एकमेकांसोबत दिसत होतो, सर्वकाही शेअर करत होतो, त्यामुळे सर्वांना वाटलं की सर्वकाही ठीक होईल. मात्र विवाहित जोडप्याची ती भावना आता मनात राहिली नव्हती. आम्हा दोघांच्या कुटुंबीयांसाठी ही खूप मोठी बातमी असेल”, असंही आकांक्षाने सांगितलं.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *