शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांचाही समावेश आहे. आजपासून उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात मेळावे आणि सभा घ्यायला सुरुवात केली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाची यवतमाळमध्ये सभा पार पडली. यात खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊत काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
बाजारात कुणी 500 रुपयांना घेतलं नसतं…
खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आम्ही शिवसेनेसोबत राहतो म्हणून उपकार करत नाही. बाळासाहेबांनी खूप दिलं. निष्ठावंत शिवसैनिक आहेत म्हणून ही शिवसेना वादळात, संकटात उभी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सभा सुरू आहे. इथे शेतकऱ्यांचा माल येतो. विकला जातो. त्याला फार भाव मिळत नाही. 15 दिवसापूर्वी एक माल आला आणि 50 कोटीला विकला गेला. 50 कोटी भाव झाला त्याचा. या बाजारात त्याला कोणी 500 रुपयात घेतलं नसतं. तो शिवसेनेत आला. त्याला उद्धव ठाकरेंनी खासदार केला. म्हणून त्याची किंमत 50 कोटी झाली. उद्याच्या निवडणुकीत त्याची पाच रुपयेही किंमत ठेवू नका.
ज्या मोदींचे बूट चाटायला गेलात त्यांनी…
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले कूी, ‘मला आश्चर्य वाटतं, विकास निधीसाठी गेले. माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. अरे कसला विकास करणार तुम्ही. 12 वर्षात मोदी देशाचा विकास करू शकले नाही. त्या मोदींच्या वाराणासीत जा, रस्ते नाही, पाणी नाही, पूल नाही, ज्या मोदींचे बुट चाटायला गेला, ते विकास करू शकले नाही, तुम्ही काय विकास करणार. कुणाकडे गेले तर ज्यांनी राम मंदिराच्या पेटीतून 2 हजार कोटी मोदींच्या लोकांनी चोरले. त्या मोदींचे बुट चाटायला गेले.
शिवसेनेचा झेंडा यवतमाळवर कायम राहील – राऊत
संजय राऊत यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘काल उद्धव ठाकरेंचं नागपूरला आगमन झालं. प्रचंड गर्दी झाली. एकनाथ शिंदे आणि गद्दारांनी पाहिलं असेल तर कळलं असतं शिवसेना जागेवर आहे. जागेवर राहिल. तुमच्या छाताडावर पाय ठेवून लोकसभा आणि विधानसभेला जाईल. यवतमाळ हा कायम बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा जिल्हा आहे. शिवसेनेचा भगवा झेंडा यवतमाळवर कायम राहिला आणि कायम राहील.’