अनिल अग्रवाल, देवेंद्र फडणवीसImage Credit source: एजन्सी
Anil Agarwal Meet Devendra Fadnavis: केतन अग्रवाल खून प्रकरणात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहे. अग्रवाल कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. तर भावी नवऱ्याचा खून करणारी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात केवळ हे दोघेच नाही तर अजून काहींचा हात असल्याचा दावा केतनचे वडील अनिल अग्रवाल यांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणात अजून काही जणांची धरपकड होण्याची शक्यता आहे. अनिल अग्रवाल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा अथवा कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
सिया दारू पित असल्याचे आले समोर
माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरवसा आहे. एलसीबी टीम, लोणावळ्यातील गुन्हे शाखा आणि एसपी गिल यांनी याप्रकरणात चांगले काम केले आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. पण अजूनही त्यांचा तपास सुरू आहे. सीसीटीव्हीत अनेक गोष्टी समोर येत आहे. त्याआधारे ते अजून खुलासे करत आहेत. पण त्यांनी मला अजून सांगितलेले नाही. सिया दारू पित असल्याचे आम्हाला माहिती नव्हते. तिच्या कुटुंबियांनी ती पार्टी वगैरे करत नसल्याचे म्हटले होते. पण आता या गोष्टी समोर येत आहे. सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे मित्र होते. त्यामुळे त्यालाही या सर्व कटाची माहिती असू शकते. दोघेही मित्र होते. अशी माहिती अनिल अग्रवाल यांनी दिली.
याप्रकरणात अजून काहीचा सहभाग
केतन अग्रवाल प्रकरणात अजून काहींचा सहभाग असू शकतो असा दावा त्याचे वडील अनिल अग्रवाल यांनी केला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याने त्यांनी त्यावर अधिक बोलण्यास नकार दिला. तर केतनच्या डोक्याला विगचा एक छोटासा पॅच लावलेला होता. ही माहिती आम्ही लग्न ठरवण्यापूर्वी सियासह तिच्या कुटुंबाला दिली होती. आम्ही ही गोष्ट लपवली नाही. हीच बाब कबुलीजबाबात समोर आल्याचेही ते म्हणाले.
न्याय द्या, आई-वडिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. केतन अग्रवालचे आई-वडीलांनी त्यांची भेट घेतली आणि न्याय देण्याची मागणी केली. याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी अटकेत आहे. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. तर थोड्यावेळीपूर्वी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याचा उच्चार केला. हा केवळ गुन्हा नाही तर सामाजिक स्थितीचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. तरुण-तरुणी असे टोकाचे पाऊल का टाकतायेत यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.