केतन हत्याप्रकरणात सिया-चेतनचा एकमेकांविरोधात कांगावा
पुण्यातील बिPनेसमनचा मुलगा, 25 वर्षीय केतन अग्रवालच्या हत्येमुळे अख्खा देश हादरला. त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच मित्रासोबत मिळून कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र केतनच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांतच त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी, हे एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. गुन्ह्याचा कट आपण रचला नसून, समोरच्यानेच केतनला संपवलं, असा दोघांचाही दावा आहे.
पुण्यातील बड्या रिअल इस्टेट व्यावसायिकाचा मुलगा आणि कंपनीचा संचालक असलेल्या केतनचा 18 जून रोजी पुण्यातील लोहगड किल्ल्याजवळील दरीत पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू अपघात मानला जात होता, मात्र नंतर तपासातून असा निष्कर्ष निघाला की केतनची होणारी पत्नी सिया आणि चेतन यांनीच त्याला कथितरीत्या लोहगडावरून खाली ढकललं होतं. त्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 जूनपर्यंत दोघांनाही पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
सिया-केतनचं घूमजाव, एकमेकांवरच केला आरोप
तपास अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, सिया-चेतनची कसून चौकशी सुरू असून, या गुन्ह्यात आपला सहभाग कमी असल्याचा दाखवायचा दोघांचाही प्रयत्न सुरूआहे. सिया आणि चेतन, हे दोघे एकमेकांवरच गुन्ह्याची जबाबदारी ढकलायाच प्रयत्न करत आहेत. पोलिसांच्या चौकशीदरम्यान चेतनने असा दावा केला की, त्याला सियासोबत पळून जायचं होतं. पण सियाने तसं करण्यास नकार दिला आणि केतनची हत्या करण्याचा आग्रह तिनेच धरला होता. तर दुसरीकडे, सियाने पोलिसांना सांगितलं की, केतनला संपवण्याची योदना ही चेतनचीच होती. 14 जूनला केतनचा संपवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर, चेतन खूप रडला असा दावाही सियाने पोलिसांसमोर केल्याची माहिती तपासातील एक अधिकाऱ्याने दिली.
पुण्यातील कॅफेतही भेटले चेतन – सिया
” सिया आणि चेतन यांची 31 मे ते 4 जून या कालावधीत पुण्यातील एका कॅफेमध्ये भेट झाल्याचंही आमच्या निदर्शनास आलं आहे. आम्ही या भेटीचा तपास करत असून, ती भेट कटकारस्थानाचा भाग होती का, हे शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असंही त्या अधिकाऱ्यावने नमूद केलं. तपासादरम्यान समोर आलेली कॅफेमधील भेट आणि इतर पुराव्यांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. केतनची हत्या पूर्वनियोजित होती हे दर्शविणारे पुरावे म्हणून तपास अधिकाऱ्यांनी यापूर्वीच सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल नोंदी आणि आरोपींमधील संवादाकडे निर्देश केला होता.
बोस्टनमध्ये मास्टर्स पूर्ण करून केतन भारतात परतला होता. त्याच्या कुटुंबाची सियाच्या कुटुंबाशी 1990 च्या दशकापासून ओळख होती आणि या वर्षाच्या सुरुवातीला गुलबर्गा येथील एका लग्नात त्यांची भेट झाली. लग्नाबाबतची चर्चा वेगाने पुढे सरकली आणि अवघ्या एका आठवड्यात त्यांचा साखरपुडा झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र सियाचे चेतनसोबत कथित प्रेमसंबंध होते आणि तिला केतनशी लग्न करायचे नव्हतं. असे असूनही, या वर्षाच्या अखेरीस केतन-सियाच्या भव्य लग्नाची तयारी सुरू होती आणि दोन्ही कुटुंबांकडून राजस्थानमध्ये एका शानदार समारंभाची तयारी सुरू होती.