राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे धक्के बसले आहेत. काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना झटका बसला असून एका बड्या नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा नेता कोण आहे आणि त्याने आपल्या पदाचा राजीनामा का दिला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बड्या नेत्याचा राजीनामा
6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोणतेही कारण आता अथवा राजकीय विश्लेषण न देता राजीनामा देत असल्याचे इंगवले यांनी म्हटले आहे. रविकिरण इंगवले यांनी यापूर्वी दोन वेळा शहर प्रमुख आणि सध्या जिल्हाप्रमुख पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. आता त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली आहे.
राजीनाम्याचे कारण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, रविकरण इंगवले यांची गेल्या वर्षी जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली होती, मात्र आता त्यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इंगवले यांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण पक्षातील दोन गटांतील सातत्याने होणारा वाद आणि तक्रारी असल्याचे समोर आले आहे. इंगवले यांनी आपल्याला पक्षात कोणाचीही मदत मिळत नाही आणि एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आता इंगवले यांचे राजकीय भविष्य नेमकं काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरेंना सलग दुसरा धक्का
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षात फुट पडल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार संजय दिना पाटील, खासदार संजय जाधव, खासदार संजय देशमुख, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकेरेची साथ सोडली असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता इतरही काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे, त्यामुळे पक्षाला मोठा झटका बसला आहे.