शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित खासदारांच्या मतदारसंघात जात सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. काल उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या मुंबईतील मतदार संघात जात सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप ईशान्य मुंबईची जागा मिंध्यांना सोडणार आहे का? असं विधान केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आता ठाकरेंच्या या विधानावर भाष्य करत मोठं विधान केलं आहे.
शिंदेंनी ठाकरेंचे आव्हान स्वीकारलं
उद्धव ठाकरेंच्या विधानाचा अर्थ असा होता की, शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांना पुढील लोकसभेत उमेदवारी मिळणार नाही. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, ‘सहाचे सहा खासदार हे शिवसेनेच्या तिकीटावर उभे राहतील. धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील. शिवसेनेत हे सर्वजण सामील झाले आहे. तुम्ही समजून घ्या काय समजून घ्यायचं ते.’ अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे आव्हान स्वीकारले आहे.
खासदारांचे प्रश्न सोडवणार
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘सहा खासदार सोबत आले आहेत. लाखो लोकांनी मतदान केल्याने ते निवडून आले आहेत. त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि जनता आणि सहा लोकांची ताकद आता वाढली आहे. त्या ठिकाणी शिवसेना अधिक बळकट होईल. त्यांच्या मतदारसंघातील विकास कामं, प्रश्न आणि प्रकल्प प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे.’
सर्वांचा मानसन्मान राखला जाईल – शिंदे
पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘मी दिलेला शब्द पाळतो हे माहीत आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून वागलो. आताही कार्यकर्ता म्हणून वागतो. इथे कोणी मालक नाही. नेता नाही. सहकारी आहोत. सर्व कार्यकर्ता म्हणून काम करेल. त्यामुळे मी तुमच्याशी कार्यकर्त्यांसारखाच वागेल. मानसन्मान राखला जाईल. तुमच्या कार्यकर्त्यांचाही मानसन्मान राखला जाईल. कुटुंब म्हणून पुढची वाटचाल करू.