तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने धमाका केला आहे. इंडिया ए टीमने वनडे ट्राय सीरिज (Tri Nation A Series in Sri Lanka 2026 ) जिंकली आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेवर (India A vs Sri Lanka A Final) एकतर्फी विजय मिळवत सीरिज आपल्या नावावर केली आहे. दांबुल्यातील रनगिरी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली आणि विजयी करण्यात योगदान दिलं. वैभव सूर्यवंशी हा या विजयाचा हिरो ठरला. वैभवने केलेल्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुस्कारने गौरवण्यात आलं. सामन्यात नक्की काय झालं? हे जाणून घेऊयात.
वैभव सूर्यवंशीचा झंझावात
ओपनर वैभव सूर्यवंशी याने केलेल्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 377 धावा केल्या. भारतासाठी वैभवने सर्वाधिक धावा केल्या. वैभवने 29 चेंडूत 94 धावांची वादळी खेळी केली. वैभवने या खेळीत 10 चौकार आणि 8 षटकार लगावले. तसेच प्रियांश आर्या याने 39 धावा जोडल्या. तर कर्णधार तिलक वर्मा याने 67 रन्स केल्या. तर अनुकूल रॉय याने अखेरच्या टप्प्यात 15 चेंडूत 39 धावा केल्या.
भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. श्रीलंकेसाठी वानुजा सहन, कुगाथास मथुलन आणि रविंदु फर्नांडो या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर इतरांनी भारतीय फलंदाजांसमोर गुडघे टेकले.
श्रीलंकेची बॅटिंग
श्रीलंकेची विजयी धावांचा पाठलाग करताना काही खास सुरुवात राहिली नाही. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. भारताने श्रीलंकेला 17 बॉलआधीच ऑलआऊट केलं. भारताने श्रीलंकेला 47.1 ओव्हरमध्ये 311 रन्सवर ऑलआऊट केलं.
श्रीलंकेसाठी वानुजा साहन याने सर्वाधिक 62 धावा केल्या. सदीरा समरविक्रमा याने 52 धावांचं योगदान दिलं. विजयकांत याने 39 आणि कॅप्टन सहान अरचिगे याने 38 धावा केल्या. श्रीलंकेच्या या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना श्रीलंकेला विजयी करता आलं नाही. भारतासाठी यश ठाकुर आणि विपराज निगम या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. अनुकूल रॉय याने दोघांना बाद केलं. तर अशोक शर्मा आणि तिलक वर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवत श्रीलंकेचं पॅकअप करण्यात योगदान दिलं.