Kailas Patil धाराशिव : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदार फुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. धाराशिव-कळंबचे ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे. कैलास पाटील यांनी मला जायचं असतं तर सूरतच्या बॉर्डरवरुन परत आलो नसतो असं म्हटलं आहे. ओमराजे निंबाळकर आणि माझी मैत्री आहे परंतु मैत्री वेगळी आणि आणि राजकारण वेगळं आहे, असं पाटील यांनी म्हटलं.
सरकारचं निधी द्यायचा नाही हे धोरण : कैलास पाटील
कैलास पाटील म्हणाले की निधी मिळत नाही, काम करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे, आपण बघतोय की, यापूर्वीही सरकारं होती, त्या काळातही विरोधी पक्ष होते. पण आताचं सरकारची कार्यपद्धती विरोधी पक्षाच्या आमदार, खासदार, नगरसेवक किंवा सरपंच असू द्या, त्याला निधी द्यायचा नाही, हे त्यांचे धोरण ठरलेले आहे. विरोधी पक्षातील आमदारही शेवटी लोकप्रतिनिधी आहेत. विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून आला तरी त्या भागातील एखाद्या मतदारसंघातील जनता काही एका पक्षाची नसते. सत्ताधारी पक्षालाही काही प्रमाणात मतदान झालेले असते. आपण मंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा, तेव्हा स्पेसिफिक शब्द वापरतो, ममत्वभाव न बाळगता… पण हा ममत्वभाव सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत का? आमदार आणि खासदार दुसऱ्या पक्षाचा असेल तर त्यामध्ये तेथील जनतेची चूक काय? ही चुकीची पद्धत सत्ताधारी पक्षाने आणली आहे. हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे, असे कैलास पाटील ‘बीबीसी मराठी ‘ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
पक्षनेतृत्त्वाची चूक आहे, असं म्हणता येणार नाही. सत्ताधारी पक्षाने परिस्थितीच अशी तयार केली आहे की, सगळीकडे सगळ्यांना ब्लॉक करायचं, कुठेच हालचाल करायला जागा ठेवायची नाही. विरोधी पक्षाचा प्रत्येक माणूस कसा अडचणीत येईल, यंत्रणा, विकासनिधी या माध्यमातून असे सत्ताधारी पक्षाचे धोरण आहे, कैलास पाटील यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे पक्षाची पुढची दिशा कशी असेल याबाबत आम्हाला मार्गदर्शन करतील, असंही पाटील म्हणाले.
ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत कैलास पाटील काय म्हणाले?
आमदार कैलास पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी अजूनही माझा संपर्क झाला नसल्याचं म्हटलं.. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मी जात आहे, प्रमुख पदाधिकारी आम्ही जात असतो. उद्या मुंबईत आमदार, जिल्हाप्रमुख , संपर्कप्रमुख यांची बैठक बोलावली आहे. पक्षप्रमुख काय सूचना देतात त्यानुसार पुढील रणनीती असणार, असं कैलास पाटील म्हणाले.
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं