उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. गेल्या आठवड्यात रविवारीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी केवळ चारच खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पाच खासदार हे ऑनलाईन हजर असल्याचा दावा करण्यात येत होता. तेव्हापासूनच राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये या सर्व खासदारांनी बंडखोरी केली आहे. त्यानंतर आज सर्व खासदारांच्या नावे व्हीप जारी करून उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला केवळ 9 पैकी तीनच खासदार उपस्थित होते. यावरून आता शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे, लवकरच त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होऊ शकते.
दरम्यान दुसरीकडे या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. खासदार संजय राऊत यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी या खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजाभाऊ वाझे, अरविंद सावंत, अनिल देसाई हे तीन खासदार बैठकीला होते. आम्ही इतरांवर कारवाई करू. त्यांना निलंबित करण्याची कार्यवाही करू. आधी लोकसभेची प्रक्रिया करणार. त्यानंतर कोर्टात जाऊ. ही लढाई संसद आणि कोर्टात चालेल. रस्त्यावरही चालेल. रस्त्यावरची लढाई महाराष्ट्रात सुरू झाली आहे. गद्दारांना सुरक्षा दिली आहे. आता भारत सरकारने त्यांना लष्कर द्यावं, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
आता गद्दार देवाचा आशीर्वाद घेत आहे का? गद्दारी केली आणि देवाचा आशीर्वाद घेत आहेत. जिथे जायचं तिथे जा. काल अधिक पाच पाच कोटी मिळाले. त्या पैशालाही सेक्युरिटी मिळाली आहे. हे सर्व निवडणूक हारणार आहेत. नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे. आम्ही त्यांना गद्दार म्हणणार नाही. यांनी नैतिकतेचं पालन केल्याने राजकारणातील हे नवीन संत आहेत. हे आम्ही लोकांना सांगू. तुम्हाला ज्या पक्षात जायचं जा. आणि निवडणूक लढवून निवडून या. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे, म्हणून त्यांना संरक्षण दिलं गेलं आहे. ते टायगर कसले? टायगर असे लपत असतात का? आम्ही खरे टायगर आहोत. आता आम्ही राज्यात ऑपरेशन तुडवा सुरू करणार आहोत असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.