महाराष्ट्राच राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाईल, राजाभाऊ वाजे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यात संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, “मागे जे झालं, त्याची पुनरावृत्ती होणार असेल तर जनता गप्प बसणार नाही. शिवसेना नाहीच. जो राडा व्हायचा तो होईल. ही गांडूगिरी, नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही” दरम्यान कोणाच्या संपर्कात नसलेल्या सहा खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांच्याशी टीव्ही 9 मराठीचा संपर्क झाला आहे.
तुम्ही दिल्लीला आहात का? तुम्हाला तानाजी सावंत दिल्लीला घेऊन गेले का? या प्रश्नावर ओमराजे निंबाळकर यांनी उत्तर दिलं. ‘मी पुण्यातच आहे. दिल्लीला गेलेलो नाही’ असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.तानाजी सावंत मला दिल्लीला घेऊन गेलेले नाहीत असही त्यांनी स्पष्ट केलं. तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत आहात का? यावर ओमराजे निंबाळकर यांनी थेट उत्तर देणं टाळलं.
त्यांच्या राजकीय भवितव्यात शिवसेनेचा मोठा वाटा
ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे, निष्ठावंत खासदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी फुटून बाहेर पडणं हा ठाकरेंसाठी मोठा झटका असेल. ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भवितव्यात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. एकदा ते शिवसेनेच्या तिकीटावर आमदार, दोनदा खासदार झाले. 2006 साली वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येमुळे ओमराजे निंबाळकर यांना वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी राजकारणात प्रवेश करावा लागला. शांत, संयमी स्वभावाचे राजकारणी म्हणून ते ओळखले जातात. धाराशिव जिल्ह्यातून येणाऱ्या या खासदाराचा तळागाळातील जनतेसोबत दांडगा जनसंर्पक आहे. भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय पाटील, ओमराजे निंबाळकर , संजय देशमुख हे खासदार ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं बोललं जातं.