उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे लवकरच नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठक बोलावली होती. उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावल्यापासूनच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला पक्षाच्या एकूण 9 खासदारांपैकी 4 खासदारच उपस्थित होते. इतर खासदार ऑनलाईन उपस्थित होते, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली, तसेच सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.
परंतु आता सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना वेग आला असून, खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
‘वेगळा गट स्थापन करणार यात कोणतंही तथ्य नाही, मी संध्याकाळी कमासाठी दिल्लीला जाणार आहे, कामासाठी मला दिल्लीत जावं लागतं. मला याबद्दल माहिती नाही. कालच मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीला आम्ही चौघंजण हजर होतो. बाकीचे सर्वजण ऑनलाईन उपस्थित होते. त्यामुळे या चर्चेत काही तथ्य आहे, असं मला वाटत नाही, असं राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी दिल्लीत जाऊन प्रतापराव जाधव यांची भेट घेतली, आहे त्यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. ‘मला त्यात काही विशेष वाटत नाही, संजय देशमुख हे रविवारी व्हीसीद्वारे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले, आणि प्रतापराव जाधव हे देशाचे मंत्री आहेत. त्यामुळे मंत्र्यांना भेटायला गेले म्हणजे वेगळा गट स्थापन करतो असा त्याचा अर्थ होत नाही. मी उद्या दिल्लीला जाणार आहे, परवा माझी बैठक आहे, दिल्लीला कमिटीची बैठक आहे, त्यामुळे मी उद्या संध्याकाळी दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे असं कामानिमित्त कोणीही दिल्लीला जाऊ शकतं, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही, असं यावेळी राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं आहे.