पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मित्रांमध्ये किरकोळ वादातून भांडण झालं होतं. वाद मिटलाही होता. सर्वजण निघूनही गेले होते. पण पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्या वादातून एकाने दुसऱ्याचा गळाच आवळला. त्यामुळे 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. एका 15 वर्षीय मुलाने त्याचा गळा दाबून खून केला. पुण्याच्या राजगड तालुक्यातील मालवली गावात ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे..
विकास सुरेश जाधव (वय 18, रा. मालवली, ता. राजगड) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रोहन पांडुरंग पवार (वय 23) यांनी राजगडच्या वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ताडीच्या नशेत अल्पवयीन मुलाकडून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास मालवली येथील राजतोरण शाळेच्या मैदानाजवळील आंब्याच्या झाडाजवळ काही युवकांमध्ये वाद झाला होता. हा वाद मिटवून सर्वजण निघाले. मात्र, कोंढवली फाट्यानंतर आरोपीने पुन्हा मोटारसायकल मैदानाजवळ नेण्यास सांगितले. त्यानंतर विकास जाधव आणि आरोपी यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपीने विकासचा गळा जोरात दाबल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दोघांना वेगळे केलं, पण…
घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी दोघांना वेगळे केले. मात्र, त्यानंतर विकास बोलत नव्हता तसेच पाणीही पीत नव्हता. त्यामुळे त्याला तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. मृतदेहाचा पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.