मनसेमध्ये अंतर्गत नाराजी; पदाधिकारी, नेते नाराज, नेमकं काय घडतंय? – Marathi News | Internal dispute in MNS leaders upset—what exactly is happening


रायगड मनसेमध्ये सध्या अंतर्गत नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे. रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षातील काही पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  माजी उपजिल्हाप्रमुख संदीप ठाकूर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या नाराजीवर भाष्य करताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी एकनिष्ठपणे पार पाडणार असून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याला फोन आणि व्हॉट्सअॅप कॉल करून संपर्क साधला आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र ज्यांना राज ठाकरेंचा आदर आहे ते पक्षात राहतील, ज्यांना आदर नाही ते राहणार नाहीत, असे सूचक वक्तव्य करत बाळा म्हात्रे यांनी नाराजांना अप्रत्यक्ष इशारा देखील दिला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान  याबाबत लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांची भेट घेणार असून, रायगडमधील संघटनात्मक परिस्थिती आणि पक्षबांधणीबाबत चर्चा करणार असल्याचेही बाळा म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे रायगड मनसेतील नाराजीचे सत्र आता मिटणार की आणखी तीव्र होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नाराजीचा फटका बसणार? 

दरम्यान रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षातील काही पदाधिकारी नाराज असल्याचं बोललं जता आहे. त्यातील काही जणांनी आपली नाराजी देखील व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. आता ही नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान म्हात्रे यांच्यापुढे असणार आहे. जर ही नाराजी दूर झाली नाही तर त्याचा पक्षाला मोठा फटका रायगडमध्ये बसू शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *